फक्त 55 पेक्षा अधिक वय असलेल्या कर्मचाऱ्यांना करावा लागणार रजेसाठी अर्ज
पिंपरी – ज्या पोलिसांचे वय 55 वर्षापेक्षा अधिक आहे. त्या सर्वांना घरी बसून पगार देण्याची घोषणा गृहमंत्र्यांनी केली होती. मात्र पिंपरी चिंचवड आयुक्तालयात या निकषात बसणाऱ्या पोलिसांनी जर रजा मागितली तरच त्यांना दिली जात आहे. मनुष्यबळ कमी असल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी ही पळवाट काढली आहे.
करोनाची लागण झाल्याने आत्तापर्यंत 100 हून अधिक पोलिसांचा मुंबई, पुणे आणि राज्यातील विविध भागात बळी गेला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांमध्ये 50 हून अधिक वय असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. ज्या पोलिसांचे वय 55 पेक्षा अधिक आहे, त्या सर्वांना घरी बसून पगार देण्याचा निर्णय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केला. तसेच ज्या पोलिसांचे वय 50 पेक्षा अधिक आहे अशा पोलिसांना पोलीस ठाण्यातील ड्युटी देण्याचे निर्देशही देण्यात आले. यामुळे निवृत्तीला आलेल्या पोलिसांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पिंपरी चिंचवड शहरात अवघे चार हजार मनुष्यबळ आहे. त्यातही साप्ताहिक सुट्टी, रजा, तीर्थक्षेत्राचा बंदोबस्त, भामा आसखेड तसेच विविध घटनांमुळे निर्माण झालेला तणाव येथील बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागते. उर्वरित कर्मचाऱ्यांचे दैनंदिन कामकाज करावे लागत असल्याने नेहमीच मनुष्यबळ कमी पडते. त्यातच जर शासनाच्या आदेशाप्रमाणे कर्मचाऱ्यांना घरी बसून पगार दिल्यास दैनंदिन काम करणे अवघड जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात 55 ते 58 वय असलेले 24 अधिकारी व 89 कर्मचारी आहेत. त्यापैकी दोन अधिकारी व 11 कर्मचारी यांनी रजा घेतली आहे. तसेच 50 ते 55 वय असलेले 39 अधिकारी आणि 250 कर्मचारी आहेत. यापैकी तीन अधिकारी व 17 कर्मचारी सध्या रजेवर आहेत.
ज्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे वय 55 पेक्षा अधिक आहे त्या सर्वांना रजा देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या निकषात बसणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांनी अर्ज केले आहेत त्या सर्वांना रजा देण्यात आल्या आहेत. तसेच यापुढील काळात ज्यांचे रजेसाठी अर्ज येतील त्या सर्वांनाच रजा दिली जाईल.
– आर. आर. पाटील, सहायक पोलीस आयुक्त