आज अक्षय्य तृतीया आहे. अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त मानला जातो. याच दिवशी सत्य म्हणजेच कृतयुग आणि त्रेतायुग या दोन्ही युगांचा आरंभ झाला म्हणून याला “युगादी’ असेही म्हणतात.
हिंदु दिनदर्शिकानुसार, गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि दसरा म्हणजे प्रत्येकी एक अन् कार्तिक शुद्ध प्रतिपदा (दिवाळी पाडवा) म्हणजे अर्धा, असे साडेतीन मुहूर्त आहेत. या साडेतीन मुहूर्तांचे वैशिष्ट्य असे की, इतर दिवशी कोणत्याही शुभकार्यासाठी मुहूर्त पाहावा लागतो, तसा या दिवशी मात्र मुहूर्त पाहावा लागत नाही. या दिवसांतील कोणतीही घटिका शुभमुहूर्तच असते. हिंदू पंचांगाप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे.
खानदेशातील अक्षय्य तृतीया
या दिवसाला खानदेशात आखा तीज (आखातीज) असेही म्हटले जाते. आखाजी अर्थात खानदेशातील अक्षय्य तृतीया सासुरवाशीणींचा सण म्हणून साजरा केला जातो. खानदेशात या दिवशी घरोघरी अक्षय्यघट म्हणजे पाण्याची घागर भरली जाते. त्याच्यावर छोटं मातीचं भांडं ठेवून वरती खरबूज आणि दोन सांजोऱ्या आणि दोन आंबे ठेवतात. छोटं भांडं पितरांसाठी म्हणजे पूर्वजांसाठी असते. या दिवशी आपले पूर्वज पाणी पिण्यासाठी येतात अशी श्रद्धा आहे. आधी त्यांना पाण्याचा घट देऊन मग नवीन माठ वापरण्यात येतो. पितरांचे श्राद्ध/तर्पणविधी होतो. सकाळी उंबरठ्याचं औक्षण करून पुर्वजांचं स्मरण करून कुंकवाचं एकेक बोट उंबऱ्यावर उमटवत आणि एकेक नाव उच्चारत पितरांना आमंत्रण दिलं जातं. दुपारी चुलीवर/आता गॅसवरच “घास’ टाकतात.
आमरस, पुरणपोळी, कटाची आमटी, भजी, कुरडई असा जबरदस्त बेत असतो. आजपासूनच आंबे खायला खरी सुरुवात करतात. रस्त्यावरल्या पाणपोईंचे उद्घाटन केले जाते. खानदेशात आखाजीचं अजून एक महत्त्व आहे. भले तो लौकीक अर्थाने पितरांचा सण का म्हणेनात, पण खानदेशात हा सासुरवाशिणींचाही सण आहे. सासरी गेलेल्या लेकींना वर्षातून पूर्वी दोनदाच माहेरी जायला मिळायचं, दिवाळी आणि आखाजीला. दिवाळी घाईगडबडीत देणं घेणं करण्यात येत असे. आखाजी म्हणजे विसाव्याचा सण. सासरच्या घबडग्यातून, कामाच्या रट्ट्यातून तेवढाच आराम. त्यामुळे त्या या सणाची आतुरतेने वाट बघत. सासुरवाशिणीना गौराई असं म्हटलं जातं आणि जावयाला शंकरजी! माहेरी या सासुरवाशिणीचं खूप कोडकौतुक असायचं.
आमरस, पुरणपोळीचं गोड जेवण, पुडाच्या पाटोड्या आणि असंच गोड धोड. दुपारच्या जेवणानंतर शेजारपाजारच्या सख्या भेटायला येतात. आंब्याच्या झाडाखाली पथाऱ्या टाकल्या जातात. गप्पागोष्टी, चेष्टामस्करी सुरू होते. मग आंब्याच्या झाडांना झोके बांधले जातात. अहिराणी गाणी म्हटली जातात. अर्थात हल्ली यातलं बरंच कमी होत चाललंय. उर्वरित महाराष्ट्रात विशेषतः ग्रामीण भागात या सणाला आकीती किंवा आखीती असे म्हणतात. या दिवशी पित्रे पाणी प्यायला येतात म्हणून टेरेसवर पाणी भरून छोटासा माठ (मातीचे भांडे) ठेवतात. काही लोक आमरस पोळीचा नैवेद्यही ठेवतात. पूर्वी अक्षय्य तृतीयेपूर्वी आंबे खात नसत. आता प्रीझर्व्हेटिव्हच्या जमान्यात वर्षवर कधीही आमरस खाता येतोय.
पारंपरिक व धार्मिक माहिती
या दिवशी नर-नारायण या जोडदेवाची जयंती, परशुरामजयंती, बसवेश्वर जयंती आणि हयग्रीव जयंती येते. या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांना लेखनिक म्हणून गणपतीने मदत केली अशी आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय्य तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते. नर-नारायण या जोडगोळीने या दिवशी अवतार घेतला होता. परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते असे मानले जाते. या दिवशी परशुरामाची पूजा केली जाते. वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्रांनी झाकलेले असतात.
कृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, “या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही म्हणजेच त्याचा क्षय होत नाही, म्हणून हिला अक्षय्य तृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते.’ सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा पुण्यप्रद दिवस श्रीविष्णूपूजनाचा, श्रीविष्णू नामस्मरणाचा आणि श्रीविष्णू कृपेचा दिवस आहे. या दिवशी विष्णुसहस्रनामाची अखंड आवर्तने करावीत.
राजस्थानातील अक्षय्य तृतीया
बुंदेलखंडमधे अक्षय्य तृतीयेपासून प्रारंभ होऊन पौर्णिमेपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. त्यात अविवाहित मुली भाऊ, पिता तसेच घरातील व गावातील पुरुषांना शुभेच्छा देतात व गीतगायन करतात. अक्षय्य तृतीयेला राजस्थानमधे मुहूर्तावर पर्जन्य देवतेची पूजा करून भरपूर पावसाची अपेक्षा व्यक्त केली जाते. मुली एकत्र येऊन घरो घरी जाऊन पर्जन्यदेवतेची गाणी म्हणतात आणि मुले पतंग उडवतात. या दिवशी सात प्रकारच्या अन्न पदार्थांनी नैवैद्य दाखवला जातो. माळवा प्रांतात नवीन भांड्यावर टरबूज आणि आंब्याचे डहाळे देऊन पूजा केली जाते.