सातारा -उभ्या ऊसाची पूर्ण क्षमतेने तोड झाल्याशिवाय साखर कारखान्यांचे सुरू असलेले गाळप थांबवले जाऊ नये, असी साखर आयुक्तांची सूचना असून ऊसतोडीचे नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येऊन ठरवून दिलेल्या कारखान्यांकडे तोडणी झालेला ऊस पाठविण्याबाबत उदयनराजे भोसले यांनी विशेष पथक तयार केले आहे. या पथकाद्वारे ऊस उत्पादकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.
ऊस तोडणीमध्ये किंवा ऊस गाळपाकरीता पाठविण्याबाबत असलेल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न या विशेष पथकाद्वारे करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. ऊसाचे तोडणी किंवा गाळपाबाबत काही समस्या असतील त्या शेतकऱ्यांनी नावासह, उस लागवडीचे क्षेत्र, लागवड आणि नेमकी समस्या काय आहे याबाबतची संक्षिप्त माहिती जलमंदिर पॅलेसमधील जनसंपर्क कार्यालयात लेखी कळवल्यास अशा समस्यांचा निपटारा विशेष पथकाद्वारे केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
जिल्ह्यात ऊसाची लागवड मोठया प्रमाणात होते. यंदा साखर कारखान्यांचा हंगाम संपत आला तरीही अद्याप जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ऊस उभाच आहे. उभ्या ऊसाची पूर्ण क्षमतेने तोड झाल्याशिवाय साखर कारखान्यांचे सुरू असलेले गाळप थांबवले जाऊ नये. कार्यक्षेत्रातील आणि अतिरिक्त कार्यक्षेत्रातील ऊसाचा शेवटचा फड तोडल्याशिवाय कारखाना बंद होणार नाही,
यासाठी आवश्यक ते सुक्ष्म नियोजन करण्यात यावे. जेणेकरुन उस उत्पादकांची आर्थिक कोंडी होणार नाही, अशा सूचना राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना दिल्या असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. उसाचा शेवटचा फड तुटेपर्यंत गाळप सुरु राहिले पाहिजे याबाबत उदयनराजे यांनी साखर आयुक्तांशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. तसेच लेखी सूचनादेखील केली आहे.