देशात करोनामुळे दररोज हजारो लोक मृत्युमुखी पडत असताना आयपीएलचा धुरळा सुरू राहणे ही खरोखरच दुर्दैवी बाब होती. एकीकडे करोना रोखण्यासाठी बाजारपेठा बंद असताना दुसरीकडे आयपीएलचा जल्लोष कानावर पडत होता. अर्थात, करोनाच्या प्रत्येक लाटेबाबत नागरिकांना सजग केले जात असताना आयपीएलमध्ये सहभागी होणारे खेळाडू आणि आयोजकही संपूर्णपणे अलिप्त कसे राहू शकतात, असा प्रश्न आहे.
यादरम्यान, स्पर्धा सुरक्षितरित्या होत असल्याचा आयोजकांकडून वारंवार दावा केला जात होता. बायोबबल म्हणजेच जैव सुरक्षित वातावरण तयार केल्याचे सांगण्यात आले होते. यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका राहात नाही; परंतु काही दिवसांपासून काही संघांतील खेळाडूंना करोनाची लागण झाल्याने बायोबबलदेखील करोनाला रोखू शकत नाही, हे सिद्ध झाले. साहजिकच आयोजकांनी आयपीएलचे सामने अनिश्चित काळासाठी स्थगित केले. सर्वात अगोदर कोलकाता नाइट रायडरच्या दोन खेळाडूंना बाधा झाली आणि त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या संपूर्ण संघाला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.
त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्जच्या तीन सदस्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली; परंतु जगभरात आणि विशेषत: भारतात करोनाने हाहाकार माजवलेला असताना आयपीएलचे आयोजक आणि खेळाडूंना या स्थितीची काहीच माहिती नव्हती का? किंवा करोनाचे गांभीर्य समजले नव्हते का, असा प्रश्न पडतो. बायोबबल नावाच्या सुरक्षा यंत्रणेचा दाखला वारंवार दिला जात होता. मग अचानक खेळाडूंना करोनाची लागण कशामुळे झाली. करोनाचा विषाणू कोणत्याही मार्गाने आणि कोणत्याही वेळी तुमच्यावर हल्ला करत आहे. असे असताना आयपीएलमध्ये सामील झालेले खेळाडू आणि सर्व कर्मचारी, कामगार हे बायोबबलच्या जिवावर किती दिवस सुरक्षित राहतील? आता करोनाची लागण झाल्यानंतर त्याचे खापर बीसीसीआय किंवा अन्य संस्थांवर फोडले जाणे स्वाभाविक आहे आणि ही त्यांची जबाबदारी आहे.
लाजिरवाणी बाब म्हणजे देशात दररोज साडेतीन ते चार लाख लोक बाधित होत असताना आणि ऑक्सिजनअभावी हजारो लोकांचा मृत्यू होत असताना, सर्वत्र शोकाकूल वातावरण असताना आयपीएलचा जल्लोष सुरू राहतो ही बाब खूपच खेदजनक आहे. खेळाडू आणि आयोजकांना देशातील भयावह स्थितीचा अंदाज कसा आला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. देशातील हजारो नागरिक करोना खर्चाचा भार सहन करू शकत नसल्याचे चित्र आहे. औषध आणि ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्णांना प्राण गमवावे लागत आहेत. अशावेळी आयपीएलमध्ये पैशाचा महापूर वाहत होता. आयपीएलचे आयोजन केल्याने बीसीसीआयवर प्रचंड टीकेची झोड उठली; परंतु त्याची त्यांनी तमा बाळगली नाही.
स्पर्धेच्या प्रारंभी कोविडची लाट अधिक पसरली नव्हती. परंतु स्पर्धा सुरू झाल्यानंतर संसर्ग पसरण्याला वेग आला. आयपीएलवर टीकेची धार आणखी तीव्र होण्यामागे ऑस्ट्रलियन खेळाडूची टिप्पणी कारणीभूत ठरली. त्यांनी भारतातील करोनाच्या स्थितीवरून काळजी करण्यास सुरुवात केली आणि काही खेळाडूंनी आयपीएल सोडण्याचा निर्णय घेतला. भारतात खेळाडू आणि बीसीसीआयचे संबंध पाहता भारतीय खेळाडू बीसीसीआयला तीव्र विरोध किंवा सल्ला देऊ शकत नाहीत; परंतु एकानंतर एक खेळाडू आणि सहकारी आजारी पडू लागले तेव्हा बीसीसीआयकडे स्पर्धा रद्द करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. बीसीसीआय संघटना ही सर्वात श्रीमंत क्रीडा संघटनेपैकी एक मानली जाते. आयपीएलचे आयोजन सर्वांत महागडे मानले जाते.
यासाठी अनेकांचे हजारो कोटी रुपये अडकलेले असतात आणि त्या स्पर्धा रद्द करणे म्हणजे हजारो कोटींचा फटका होय. या स्पर्धेशी अनेक घटक जोडलेले असतात. खेळाडू आणि टीमशी निगडित कर्मचारी वगळता प्रायोजक, टीव्ही चॅनेल, जाहिराती, मार्केटिंग उद्योग, टीमला क्रीडा साहित्य पुरवणाऱ्या कंपन्या यांचा समावेश असतो. त्यामुळे कितीही अस्मानी संकट आले तरी आयपीएल रद्द करायची नाही आणि ती सुरूच ठेवायची असाच अविर्भाव बीसीसीआयचा होता. त्यामुळेच देशात करोनाने धुमाकूळ माजवलेला असताना आयपीएलचे बार उडत होते. गेल्या वर्षी दुबईत आयपीएलचे आयोजन यशस्वी ठरले होते. कारण तेव्हा करोनाची लाट आताएवढी शक्तिशाली नव्हती. आखाती देशात करोनाचा प्रभाव कमी होता.
आता बीसीसीआयवर संपूर्ण स्थिती हाताळण्याची जबाबदारी आहे. आयपीएलच्या संपर्कात आलेल्या लोकांना अधिक संसर्ग होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल. ऑस्ट्रेलियाने भारतातून खेळाडूंना येण्यास मनाई केली, त्यामुळे त्यांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी बीसीसीआयवर होती. खेळाडूंना बाधा होण्याच्या अगोदरच देशातील स्थिती पाहून सामने वेळीच स्थगित केले असते तर चांगले झाले असते. शेवटी उशिरा का होईना स्पर्धा रद्द केली हे बरे झाले. सर सलामत तो पगडी पचास. खेळ तर चालूच राहील, त्याअगोदर जीव महत्त्वाचा आहे, हे बीसीसीआयला अखेर कळून चुकले. आजच्या घडीला देशात अनेक धनाढ्य मंडळी, उद्योगपती, सामाजिक संस्था या पीडितांना मदत करत आहेत आणि अर्थसाह्यदेखील करत आहेत.
अशावेळी आयपीएलच्या आयोजकांनी करोना संकट काळात सरकार आणि जनता यांच्या पाठीशी मदतीसाठी खंबीरपणे उभे राहण्याची गरज नव्हती का? अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचा दावा करणाऱ्या आयोजकांनी खेळाडूंवर करोनाची टांगती तलवार ठेवली. देशभरात मृत्युमुखी पडणारे नागरिक हे कोणत्या ना कोणत्या खेळाडूंचे चाहते असतील. याची जाणीव संबंधितांना झाली कशी नाही? यांसारखे असंख्य प्रश्न उपस्थित होत आहेत.
एकंदरीत आपल्या चोहोबाजूंनी वेदनेचा हुंकार ऐकू येत असेल, चिता जळत असतील आणि त्याचा मुकाबला करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असतील तर अशा काळात मनोरंजनासाठी आयपीएलचे आयोजन करणे ही एकप्रकारची क्रूर चेष्टाच होती. माणुसकी गळून पडल्याचे द्योतक म्हणावे लागेल.