Latur Lok Sabha Constituency । देशातील लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा येत्या २६ एप्रिलला पार पडणार आहे. यात राज्यातील एकूण ८ मतदारसंघाचा समावेश आहे. यातील लातूर लोकसभा मतदारसंघ कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र मागच्या काही निवडणुकांचा इतिहास पाहिला तर काँग्रेसला म्हणावं तस यश पदरात पडून घेता आला नाही. 1977 ला उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचं विभाजन झालं आणि लातूर लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला. पुढे माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी 5 ऑगस्ट 1982 ला स्वतंत्र लातूर जिल्ह्याची निर्मिती केली. तेंव्हापासून ते आजपर्यंतच्या 28 वर्षांमध्ये लातूरने स्वतःची एक स्वतंत्र ओळख बनवली आहे.
लातूरच्या मतदारांकडे ‘राजकीय बॅलन्स’ साधण्याचं कसब Latur Lok Sabha Constituency ।
मांजरा नदीच्या खोऱ्यातल्या या जिल्ह्यात पाऊस तसा जेमतेमच पडतो, जवळपास दरवर्षी या जिल्हयावर दुष्काळाचं सावट घोंगावत असतं पण राजकारणाच्या बाबतीत मात्र लातूर हा अत्यंत सुपीक जिल्हा म्हणून ओळखला जातो. लातूरने महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री आणि एक मातब्बर केंद्रीय मंत्री दिले आहेत. कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात या तीनही मातब्बर नेत्यांना मतदारांनी पराभवाची धूळ देखील चाखायला लावली आहे. त्यामुळे लातूरच्या मतदारांकडे ‘राजकीय बॅलन्स’ साधण्याचं एक उत्तम कसब आहे. मुख्यमंत्री राहिलेल्या विलासरावांचा, शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा आणि देशाचे गृहमंत्री राहिलेल्या शिवराज पाटील चाकूरकरांचा पराभव करण्याची किमया लातूरच्या मतदारांनी साधली आहे.
एकेकाळी काँग्रेसला साथ देणाऱ्या या जिल्ह्यात मागच्या दहा वर्षांपासून मात्र काँग्रेसचा खासदार निवडून येऊ शकलेला नाही. विलासराव देशमुखांच्या मृत्यूनंतर दोन विधानसभा वगळता काँग्रेसला फारसं काहीही करता आलेलं नाही. लातूर आणि शेजारच्या जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी भाजपवासी होण्याचा निर्णय घेतलेला आहे. लातूरचे आमदार आणि माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. पण एका कार्यक्रमात स्वतः अमित देशमुख यांनी मी कुठेही जाणार नसल्याची घोषणा केली आहे.
मतदारसंघात दुरंगी लढत होणार Latur Lok Sabha Constituency ।
लातूर लोकसभा मतदारसंघ हा २००९ मध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी २००९ मध्ये कोल्हापूरचे जयवंतराव आवळे यांना उमेदवारी देऊन निवडून आणले. त्यानंतरच्या दोन्ही निवडणुकीत भाजपचे वर्चस्व राहिले. यावेळी पुन्हा एकदा भाजपने खासदार सुधाकर शृंगारे यांना पुन्हा एकदा तिकीट जाहीर केलं आहे. त्यामुळे भाजपकडून विजयाची हॅट्ट्रिक साधण्याचा प्रयत्न असेल. या वेळी डॉ. शिवाजी काळगे यांच्या माध्यमातून नवखा उमेदवार काँग्रेसने पुढे आणला आहे. या मतदारसंघात सातत्याने काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत झाली आहे. यावेळेसदेखील अशीच दुरंगी लढत होणार आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात नेमका कोणच्या बाजूने कौल लागणार हे ४ जून रोजीच समजणार आहे.