पवनानगर – मागील तीन दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे तुंग गावात भूस्खलन झाले आहे. तुंग किल्ल्याच्या पायथ्याला तुंग गावालगत सुमारे 300 मीटर लांब भूस्खलन झाल्यामुळे घरावर दरड कोसळून घर जमीनदोस्त झाले. ही घटना घडली त्या वेळी या घरातील सर्व जण शेतीच्या कामासाठी बाहेर गेल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे.
तुंग गावचे रहिवासी सीताराम पठारे यांचे घर व किराणा दुकान जवळच 100 मीटर अंतरावर आहे. सकाळी घरातील सर्व माणसे भात लावणीसाठी शेतात गेली होती. पाठारे हे एकटेच दुकानात बसले होते. पाऊस जास्त असल्याने दुकानात ग्राहक नसल्याने सकाळी 11 वाजता ते गावात फेरफटका मारायला गेले. काही मीटर अंतरावर गेले असता मागे जोरदार आवाज झाला परत येऊन पाहतात तर राहते घर व दुकान जमीनदोस्त झाले. त्यांच्या घरावर दरड कोसळल्याने होत्याचे नव्हते झाले. या घटनेने त्यांना अश्रू अनावर झाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, कोसळणाऱ्या पावसात पाठारे कुटुंबीयांना धीर देण्यापलीकडे गावकरी फारसे काही करू शकले नाही.