नारायणगाव – जुन्नर तालुक्यातील खामगाव (मांगणेवाडी), उंडेखडक, कोटमवाडी, तळेरान, निमगिरी (तळमाची वाडी) भिवाडे खुर्द येथे झालेल्या भूस्खलनाबाबत उपायोजना करण्याची मागणी मदत व पुनर्वसन तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे जुन्नरचे आमदार अतुल देशमुख यांनी निवेदनाद्वारे
केली आहे.
सध्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असल्याने वारंवार डोंगराचा काही भाग वाहून खाली रस्त्यावर येत असून अनेक ठिकाणी लोकवस्तीकडे जाणारे रस्ते अतिवृष्टी पावसाने खराब झालेले आहेत. कोटमवाडी (शेळके वस्ती), उंडेखडक (रावतेवस्ती), तळेरान (कळमदरी) येथील लोकवस्तीला अतिवृष्टीचा फटका बसला आहे.
निमगिरी (तळमाची वाडी) खामगाव (मांगणेवाडी), भिवाडे खुर्द परिसरात डोंगराला अतिवृष्टी पावसाने मोठमोठ्या भेगा पडत आहे. त्यातून झिरपणाऱ्या पाण्यामुळे भुस्खलन स्थिती निर्माण झाली आहे. डोंगराच्या जवळपास लोकवस्ती असल्याने नागरिकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करणे तर काही ठिकाणी संरक्षक भिंत बांधणे गरजेचे आहे.
स्थानिक नागरिक व पदाधिकाऱ्यांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही आजपावेतो काहीही कार्यवाही झालेली नाही. लोकवस्त्यांचे स्थलांतर, पुनर्वसन व लोकउपयोगी उपयोजना होण्यासाठी शासनस्तरावर तात्काळ निर्णय घेण्याची मागणी आमदार अतुल बेनके यांनी केली आहे.