दुर्घटनेत जीवितहानी नाही : बांबूची बेटे आणि भात खाचरांचे मोठे नुकसान
भोर – कोंढरी गावात माळीणच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली. या घटनेत अनेकांची घरे बचावली असली तरी गावात भूस्खलन झाल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. पाऊस सुरू असल्याने प्रशासनाकडून ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून संबंधीत यंत्रणेला सूचना करण्यात येत असले तरी गावावर
भोर-महाड मार्गावरील हिर्डोशी खोऱ्यातील कोंढरी येथील भोकरीचा माळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात भूस्खलन होऊन डोंगरातील दरड कोसळण्याची दुर्घटना बुधवार (दि. 7) दुपारी 12:30च्या सुमारास घडली. यामध्ये कोंढरी गावचे माजी सरपंच भिवबा बापू पारठे, चंद्रकांत गोविंद पारठे, सुरेश चंद्रकांत पारठे, किसन खरुसे, सुनील रावजी पारठे, दगडू भागू पारठे, जिजाबा गणपत पारठे, भागु दगडू पारठे आदि शेतकऱ्यांची 100 पेक्षा अधिक बांबूची बेटे, कलमी आंब्याची झाडे आणि भातखाचरात पिकांच्या ताली जमीनदोस्त झाल्या आहेत.
कोंढरी गाव हे नीरादेवघर धरणातील प्रकल्पग्रस्त गाव आहे. डोंगरानात वसलेल्या या गावात अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. यावर्षी या डोंगररानात कृषी विभागाने समतल सलग चर खोदले आहेत, त्यामुळे जमिनीत अतिवृष्टी आणि खड्ड्यात साचलेल्या पाण्याने भेगा पडून दरड कोसळली असून अनेक भागात भूस्खलन होऊन जमिनीला मोठ्या भेगा पडल्या आहेत, असे माजी सरपंच भिवबा पारठे यांनी सांगितले.
याघटनेची माहिती मिळताच भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी महसुलचे मंडलाधिकारी पांडुरंग लहारे, गाव कामगार तलाठी स्वप्निल आंबेकर यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी करून ग्रामस्थांना सुरक्षीत ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना मांडलाधिकारी व गावकामगार तलाठी यांना केल्या. आज, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, प्रभारी तहसिलदार मृणाली मोरे, गटविकास अधिकारी तनपुरे, सा.बा.विभागाचे अभियंता आर.एल.ठाणगे यांनी कोंढरी गावात येऊन दुर्घटनेबाबत माहिती घेतली. हिर्डोशी येथील जि.प.च्या प्राथमिक शाळेत व राजगड ज्ञानपिठाचे समर्थ रामदास स्वामी विद्यालयात गावातील 50 पेक्षा अधिक कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले. यावेळी ग्रामविस्तार अधिकारी राजेंद्र चांदगुडे, ग्रामसेवक लोंढे, मंडलाधिकारी पांडुरंग लहारे, तलाठी स्वप्नील आंबेकर, सुनील भेलके, वारवंडचे सरपंच लक्ष्मण दिघे, कोंढरीचे उपसरपंच विलास मादगुडे, बबन मालुसरे, पोलीस पाटील शंकर पारठे, नामदेव मालुसरे तसेच दुर्घटनाग्रस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
कोंढरी गावचे पुनर्वसन करावे…
भोर तालुक्यातील नीरा देवघर धरण प्रकल्पात या गावच्या जमिनी गेल्या असून फलटण तालुक्यातील सुरवडी येथे 52 शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यात आलेले असताना आम्हाला ना पुनर्वसनातील जागा मिळाल्या की, गावठाणात जागा उपलब्ध करुन दिल्या. यामुळे शासनाने सुरवडी येथील गावठाणात जागा देऊन पुनर्वसन करावे, अशी मागणी कोंढरी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
तलाठी बचावले…
कोंढरी गावातील भोकरीचा माळ येथील जमिनीचे भूस्खलन होत असताना पाहणी करण्यासाठी गेलेले गावकामगार तलाठी पाहणी करीत असतानाच दरड कोसळी. मात्र, तलाठी स्वप्निल आंबेकर हे चलाखीने तेथून पळाले. त्यामुळे ते या दुर्घटनेतून बचावले असल्याचे प्रथमदर्शींनी सांगितले.