योगी सरकार हबकले; निवृत्त न्यायधीशामार्फत चौकशी
लखनौ/लखीमपूर खेरी- लखीमपूर खेरी हिंसाचारात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 45 लाख रुपयांची नुकसान भरपाई, जखमी झालेल्या शेतकऱ्यांना 10 लाख रुपयांची मदत उत्तर प्रदेश सरकारने सोमवारी जाहीर केली. या प्रकरणाची उच्च न्यायलयाच्या न्यायधिशामार्फत चौकशी करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमारयांनी दिली.
चारही शेतकऱ्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सोमवारी सकाळी करण्यात आले. त्यावेळी अन्य चार मृतदेहही शवविच्छेदनासाठीआणण्यात आले होते, अशी माहिती खेरी येथील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमावात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मोटारीसह तीन मोटारी घुसल्या.
त्यात चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. अन्य चार जणही या हिंसाचारत मरण पावले. या घटनेनंतर मंत्री आणि मोटार चालवणाऱ्या त्यांच्या मुलाच्या अटकेची मागणी शेतकरी व शेतकरी नेत्यांनी लावून धरली. त्यानंतर देशव्यापी निदर्शनाचे आदेश दिले.
मात्र व्यावसायिक असणारा आपला मुलगा ही दुर्घटना जेथे घडली, त्या ठिकाणी नव्हता, असा दावा करून मंत्री मिश्रा म्हणाले, या ठिकाणी अन्य चार जणांची हत्या झाली. ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते. शेतकऱ्यांमधील काही जण तलवार आणि काठ्यांनी शस्त्रसज्ज होते.