मंचर, (प्रतिनिधी) – ऊन्हाची तीव्रता सध्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून या उन्हापासून बचाव करण्यासाठी शेतकरी वर्ग जनावरांना गोठ्यात किंवा झाडांखाली बांधत आहे. तर काही शेतकऱ्यांनी विशेष करून बैलगाडा मालकांनी आपल्या बैलांसाठी सरमाड आणि कडब्याचा वापर करून मांडव बनवले आहेत. त्यामुळे उन्हापासून संरक्षण होऊन जनावरे आजारी पडू नये. यासाठी शेतकरी वर्ग काळजी घेत आहे.
सध्या उन्हाची तीव्रता राज्यभरात मोठ्या प्रमाणावर वाढली असून दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणावर ऊन आहे. या उन्हाचा त्रास माणसांबरोबरच पाळीव प्राण्यांनाही बसत असून उन्हामुळे अनेक जनावरे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळेच या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी आपल्या जनावरांना गोठ्यात किंवा झाडाखाली बांधत आहे आणि उन्हापासून संरक्षण करत आहे.
परंतु गोठ्यात पत्र्यामुळे गरम होते. यावर मात करण्यासाठी काही शेतकऱ्यांनी गोठ्यावरील पत्र्यावर उसाचे पाचट, सरमाड,कडबा यांचा वापर केला आहे. तर काही शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांसाठी सरमाड आणि कडब्याचा वापर करून शेतात मांडव बांधले आहेत.
विशेष करून उत्तर पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बैलगाडा मालक असल्याने बैल असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या बैलांसाठी शेतात सरमाड कडब्याचा वापर करून मांडव बांधले आहेत. या मांडवांचा फायदा उन्हापासून जनावरांचे रक्षण होते त्याचप्रमाणे सावली ही थंड राहते.
तसेच चारही बाजूंनी बंद असणाऱ्या मांडवातील बैल शर्यतीसाठी वेगवान धावण्यासाठी फायदा होत असतो. त्यामुळे अनेक शेतकरी वर्ग सरमाड कडब्याचे मांडव करून बैलांना अंधारी देतात व सावली करतात त्यामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील बहुतेक शेतकऱ्यांनी आपल्या बैलांसाठी मांडव बनवले असल्याचे पहावयास मिळत आहे.