मंचर, (प्रतिनिधी) – पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा गाळप हंगाम संपला आहे. त्यामुळे बीड, चाळीसगाव, पाथर्डी परिसरातील ऊसतोडणीसाठी आलेले ऊसतोड कामगार आता आपापल्या गावी परतू लागले आहेत.
दोन दिवसांपूर्वी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या गाळप हंगामाची सांगता झाली. यंदा एक महिना अगोदरच कारखान्याच्या गाळप हंगामाची सांगता झाली. दरवर्षी या परिसरात ऊस तोडणीसाठी बीड, पाथर्डी व चाळीसगाव येथील ऊसतोड कामगार येत असतात.
आता गाळप हंगामाची सांगता झाल्यामुळे ऊसतोड कामगार आपापल्या गावी परतू लागले आहेत. संसारपयोगी साहित्याची बांधाबांध करून ट्रकांमध्ये भरुन ते निघाले आहेत. त्याबरोबरच बैल इतर जनावरे, जनावरांचा चारादेखिल सोबत त्यांनी नेला आहे.
भीमाशंकर कारखाना स्थळ, कारखाना परिसरातील अनेक ठिकाणी ऊसतोड कामगारांनी तात्पुरत्या राहण्यासाठी झोपड्या उभारल्या होत्या. आता या झोपड्या काढून टाकून ते आपापल्या गावी परतू लागले आहेत.