मंचर,(प्रतिनिधी) – मंचर – घोडेगाव रस्त्यावरील निघोटवाडी फाटा येथे बायपास रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात घडू लागले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अपघात टाळण्यासाठी उपायोजना कराव्यात, अशी मागणी निघोटवाडी ग्रामपंचायत सदस्या उषा संजय चिंचपुरे यांनी केली आहे.
मंचर घोडेगाव रस्त्यावरील निघोटवाडी फाटा किंवा घोडेगाव रस्त्यावरील सततच्या वाहनांच्या वर्दळीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्त्याला अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक नसणे किंवा गतिरोधक असल्याची आगाऊ सूचना देणारे फलक नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पुणे येथून भीमाशंकरला जाण्यासाठी असणारा बायपास निघोटवाडी फाटा येथे येतो.
तसेच नाशिकवरून श्री क्षेत्र भीमाशंकर येथे जाण्यासाठी बायपासद्वारे येणारी वाहने यामुळे अपघात समोरासमोर होत असल्याचे दिसून येते. श्री क्षेत्र भीमाशंकर येथे जाण्यासाठी पुणे अथवा नाशिकहून येणारा हमरस्ता निघोटवाडी फाटा येथे बायपासद्वारे रस्ता खाली येतो आणि त्याचवेळी मंचर येथून भीमाशंकर जाणारी स्थानिक वाहने यामुळे समोरून आलेले वाहन दिसत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथेही गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात.
मंचर गावातून जाणारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रेते आणि छोटे छोटे विक्रेते व्यवसायासाठी बसलेले असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात होते. रस्त्यावरील बाजार मोकळ्या जागेत इतरत्र हलवल्यास होणारी वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मंचर नगरपंचायतनेही कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
बांधकाम खात्याकडे पाठपुरावा
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी अपघात टाळण्यासाठी आणि मंचर गावातून घोडेगाव आणि वडगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावरील भाजीपाला बाजार इतरत्र हलवावा, अशी मागणी करणारे निवेदन मंचर नगरपंचायत आणि पुणे जिल्हा भाजपा किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय थोरात यांना पाठवल्याचे ग्रामपंचायत सदस्य उषा चिंचपुरे यांनी सांगितले.