दुष्काळामुळे गरजूला रोजगार देण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन
नगर: लोकसभा निवडणुकीमुळे जिल्ह्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (रोहयो) सुरू असलेल्या कामावरील मजुरांची संख्या झपाट्याने कमी झाली होती. सध्या या योजनेअंतर्गत जिल्ह्यात 1 हजार 216 कामे सुरू करण्यात आली आहेत. तेथे 10 हजार 546 नागरिकांना रोजगार देण्यात आला होता.निवडणुकीदरम्यान 7 हजार नाकरिकांनी रोजगार हमी कडे पाठ फिरवली होती. शिर्डी व नगर दक्षिण लोकसभा निवडणूक प्रक्रीया पूर्ण झाली असून पुन्हा नागरिकांचा कल रोजगार हामीकडे वाढत आहे.
दुष्काळाच्या परिस्थितीत गरज असेल त्या प्रत्येकाला रोजगार पुरविण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या प्रत्येक मजुरास प्रती दिवस दोनशे सहा रुपये मजुरी देण्यात येते. काम संपल्यानंतर 15 दिवसांच्या आतमध्ये संबंधित मजुराचा पगार त्याच्या बॅंकेच्या खात्यावर जमा करण्यात येतो.
नगर-शिर्डी निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याअगोदर मजुरांची संख्या 17 हजार नागरिक रोजगार हमीवर काम करत होती. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायतींची 872 कामे सुरू आहेत. येथे पाच हजार 512 लोकांना रोजगार देण्यात आला आहे. इतर यंत्रणांची 344 कामे सुरू असून, तेथे पाच हजार 34 जणांना रोजगार देण्यात आला आहे. लग्नसराईमुळे ही संख्या झपाट्याने कमी झाली होती. त्यामुळे मे महिन्याच्या मध्यात पुन्हा मजुरांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तयारी केली आहे.