पाच वर्षांनी मिळाला न्याय : सामाजिक न्याय विभागाकडून परिपत्रक
पाबळ – तब्बल पाच वर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुलवंत वाणी समाजाला न्याय मिळाला असून या समाजाचा ओबीसी वर्गात पुनःप्रवेश करण्यात आला आहे.
आज (दि. 4) दुपारी दोन वाजता सामाजिक न्याय विभागाचे उप सचिव रविंद्र गुरव यांनी समाजाचा ओबीसी पुनःप्रवेशचा जी आर (परिपत्रक) ओबीसी कृती समितीचे निमंत्रक प्रकाश सिद्ध व सहाय्यक प्रशांत गोलांडे, राजेंद्र शिंदे यांच्याकडे सुपूर्त केला. दरम्यान या निर्णयामुळे कुलवंत वाणी समाजाकडून सोशल मीडियाद्वारे आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
पूर्वीपासून ओबीसी प्रवर्गात समावेश असलेल्या या समाजाला पाच वर्षांपूर्वी अचानक तांत्रिक कारण देत ओबीसी प्रवर्गाबाहेर व्हावे लागले होते. या कारणामुळे समाजाचे अतोनात नुकसान होत होते. मुलाबाळांच्या शिक्षणाच्या संधी हिरावून घेतल्या गेल्यामुळे शैक्षणिक नुकसान होत होते. यामुळे समाजातून असंतोष होता. या बाबतीत औरंगाबाद न्यायालयात दाद मागण्यात आली होती. यानंतर न्यायालयाने राज्य मागासवर्गाचा अहवाल सादर करण्याचे आदेश देत पुनःप्रवेश करण्याचे निर्देश दिले होते. या समाजाचा 2014 साली अहवाल देण्यात आला होता. या समाजाचा पुनःप्रवेश होणे अपेक्षित असताना गेली पाच वर्षे समाज मंत्रालयात चकरा मारत होता. विविध मार्गाने आंदोलन करीत विविध नेत्यांचे माध्यमातून प्रयत्न करत असताना लोकसभा निवडणुकीचे मुहूर्तावर झालेल्या मंत्रालयीन कामकाजात हा निर्णय झाला; मात्र पुन्हा आचारसंहितेमुळे प्रत्यक्ष जीआर प्रसारित होण्यास विलंब होत असल्याने समाजात अस्वस्थता होती. अखेर जीआर मिळाल्यामुळे आनंद व्यक्त केला जात आहे.
दैनिक प्रभातचे मानले आभार
दरम्यान समाजाचे वतीने शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विद्याथर्थ्यांना शैक्षणिक व आर्थिक मदत करण्यासाठी व इतर सहकार्य करण्यासाठी समाजाकडून विविध उपक्रम सुरू करण्यात आले होते. समाजाच्या ओबीसीसह इतर प्रश्नावर दैनिक प्रभातचे माध्यमातून वेळोवेळी प्रकाश टाकण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर समाजाचे वतीने दैनिक प्रभातचे ऋण व्यक्त करण्यात आले.