पुणे – “करोना’ प्रादूर्भावामुळे चीनसह संपूर्ण दक्षिण आशियातील पर्यटनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. तो प्रभाव आता भारतीय पर्यटकांवरही होत असून, यंदा कैलास मानसरोवर यात्रेसाठीच्या जाणाऱ्या भाविकांच्या आरक्षणामध्ये मोठी प्रमाणात घट होत असल्याची नोंद पर्यटन संस्थांनी नोंदवली आहे.
देशभरातून मे ते ऑक्टोबरमध्ये तिबेट कैलास-मानसरोवर यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंचे प्रमाण जास्त असते. यासाठी जानेवारीपासूनच तिकिटांचे आरक्षण केले जाते. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यंदा या यात्रेसाठी तब्बल 60 ते 75 टक्के घट झाल्याची नोंद पर्यटन संस्थांकडे नोंदवण्यात आली आहे.
वास्तविकत: तिबेट हा प्रदेश चीनपासून बराच अंतरावर आहे. तसेच समुद्रसपाटीपासून या प्रदेशाची उंचीदेखील अधिक आहे. तेथील वातावरणात अशाप्रकारचे विषाणू तग धरू शकत नाही. मात्र, प्रादूर्भावाच्या भीतीमुळे भाविक या यात्रेसाठी धजावत नाहीत.
कैलास मानसरोवर तिबेटमध्ये आहे. मात्र, तेथे जाण्यासाठी चीनचाच व्हिसा लागतो. त्यामुळे नागरिकांमध्ये त्याबाबत भीती निर्माण झाली आहे. दरवर्षी फेब्रुवारीपर्यंत होणाऱ्या आरक्षणाच्या तुलनेत यंदा या यात्रेच्या आरक्षणामध्ये 60 ते 75 टक्के घट झाल्याचे यंदा दिसून येते.’
– विश्वास केळकर, ट्रॅव्हल एजंट असोसिएशनचे अध्यक्ष