शिक्रापूर / कोरेगाव भीमा (पुणे) – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील ऐतिहासिक लढाईमध्ये शहीद झालेल्या शूरांचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळेच प्रत्येक वर्षी येथे त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही येत असतो. येथे नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता सरकारच्यावतीने आम्ही पुढाकार घेऊन लोकांना सुविधा देण्यासाठी येथील जागा सरकार विकसित करणार आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, उर्जामंत्री नितीन राऊत, शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार, सुनील टिंगरे आदी उपस्थित होते.
जगावर आलेल्या संकटाला न डगमगता महाविकास आघाडीचे सरकार काम करत आहे. कोरेगाव भीमा येथे झालेल्या ऐतिहासिक लढाईमध्ये जे शूरवीर शहीद झाले. त्या सर्वांना अभिवादन करण्यासाठी आम्ही येथे आलो आहे. मागील काही घटनेमुळे येथे गालबोट लागले यांनतर अनेक अफवा पसरविल्या गेल्या मात्र जनतेने अफवेवर विश्वास ठेवू नये. पोलीस दलाने व प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. गृह विभागाने करोनामुळे कमी प्रमाणात लोकांना येण्याचे आवाहन केले होते. त्यालादेखील नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. येथील मान्यवरांच्या वतीने कोरेगाव भीमाचा विजयस्तंभ विकास आराखडा मंजूर करा, प्रलंबित प्रकरणासाठी उच्च न्यायालयात जाण्यास मंजुरी द्या, याबाबतचे निवेदन दिले आहे.
त्यानुसार पुढील काळाचा विचार करता सरकार पुढाकार घेऊन लोकांना सुविधा देण्यासाठी येथील जागा सरकार विकसित करणार आहे. अनेकांच्या काही सूचना असून त्या सूचनांचा आदर करत सर्व कामे देखील मार्गी लावणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान कोरेगाव भीमा विजयस्तंभ सेवा संघाच्या वतीने मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कोरेगाव भीमा विजयस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी आभार मानले.