करोना तालुक्याच्या सीमेवरून डोकावतोय
– शंकर दुपारगुडे
कोपरगाव – सध्या कोपरगाव तालुक्यासह शहरात करोनाबाधित एकही रुग्ण नाही. सध्या जरी दिलासादायक वाटत असले तरी करोनाचा संसर्ग तालुक्याच्या सीमेवरुन डोकावतोय, अशी अवस्था झाली आहे. तेव्हा कोपरगाव तालुक्यातील नागरीकांनी करोनाच्या संदर्भात गाफील राहू नये. तर शेजारच्या तालुक्यातील करोना बाधितांची लागण कधी होईल हे सांगता येत नाही. तेव्हा नागरीकांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या तालुक्यात एकही करोना बाधित रुग्ण नसल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
शहरातील लक्ष्मीनगर भागातील एका ५५ वर्षाच्या महिलेचा करोना संसर्ग आजाराने मृत्यू झाला होता तर त्याच दिवशी तालुक्यातील शिंगणापुर येथील ६५ वर्षाच्या महिलेचा सारीसारख्या रोगाने संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. या दोन महिलांच्या मृत्युनंतर तालुक्यातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली होती. या घटनेनंतर आत्तापर्यंत बाधित मृत महिलेच्या कुटुंबातील सदस्यासह संपर्कात आलेले व इतर संशयीत अशा ५५ नागरीकांच्या स्त्रावचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
एक मृत महिला वगळता सर्व वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह अर्थात करोनाचा किंवा सारी संसर्गजन्य आजाराची बाधा झाली नसल्याचा अहवाल प्राप्त झाले आहेत. लक्ष्मीनगर भागातील बाधित मृत्यू महिलेच्या कुटुंबातील ८ सदस्यांना सोमवारी १९ दिवसानंतर घरी सोडण्यात आले आहे. त्यांच्या सर्व वैद्यकीय तपासण्या पूर्ण करून सोडण्यात आले आहे. तर संजय नगर, लक्ष्मीनगर येथील १८ वर्षाच्या दोन्ही युवकांचा वैद्यकीय अहवाल निगेटीव्ह आल्याने कोपरगाव करोनामुक्त झाला असला तरी तालुक्याच्या शेजारचे तालुके करोना बाधित आहेत.
तालुक्याच्या सीमेवरून आता सर्वाधिक धोका कोपरगावला वाढला आहे. येवला ६, संगमनेर ११, सिन्नर पाथरे १ असे करोना बाधित रुग्ण आहेत. तर मालेगाव येथे शेकडो करोनाचे रुग्ण वाढत आहेत. या बाधित शहरातून कोपरगावला दररोज ये-जा करणाऱ्या नागरीकांची संख्या हजारोच्या पटीत आहे. महामार्ग, मुख्य रस्ते जीवनावश्यक सेवेच्या नावाखाली खुले करण्यात आल्याने वाहनांची रहदारी वाढली आहे. खाजगी वाहनांद्वारे प्रवास वाहतुक सुरू आहे. विषेशतः रात्रीच्या वेळी सर्वाधिक नागरीक या शहरातुन त्या शहरात प्रवास करीत असल्याचे निदर्शनास येते.
मुंबई,पुणे सारख्या रेड झोन परिसरातुन नागरीक कोपरगावमध्ये विना परवाना गुपचुप येत आहेत. यावरून करोनाबाधित संसर्गजन्य आजाराचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यात करोनाचे रुग्ण आढळत होते. तेव्हा सोलापूर जिल्ह्यात एकही करोना बाधित रुग्ण नव्हता. पण एक बाधित महिला बाहेरुन आली आणि सोलापूरात करोना बाधित रुग्णांची उच्चांकी आकडेवारी पुढे येत आहे. हीच अवस्था अहमदनगर जिल्ह्याची झाली. आठ दिवसांपुर्वी ऑरेंज झोन असलेला नगर जिल्हा रेडझोनमध्ये गेला आहे. जामखेड मध्ये एका बाधित रुग्णामुळे आता बाधित रुग्णांची मोठी साखळी तयार झाली यावरून नगर जिल्ह्यातील जनजीवन अधिक धोक्यात आले आहे. तेव्हा कोपरगावच्या नागरीकांनी आपल्याकडे करोना बाधीत रुग्ण नाही म्हणुन गाफिल राहु नये. विनाकारण बाहेर फिरु नये. गर्दीच्या ठिकाणी जावू नये. स्वतः सह आपल्या कुटुंबासाठी घरात बसुन स्वच्छता राखावी. स्वतःच्या आरोग्याची काळजी घेवून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर व तहसीलदार योगेश चंद्रे यांनी नागरीकांना केले आहे.
कोपरगाव शहरासह तालुक्यातील प्रत्येक घरांची तपासणी करण्याचे काम आरोग्य विभागाच्या वतीने सुरु आहे त्यासाठी ३७ आरोग्य पथके काम करीत असुन दररोज दीड हजार नागरीकांची वैद्यकीय तपासणी केली जाते. प्रत्येकांचे थर्मल स्कॅनिंग केले जाते,रक्तातील ऑक्सिजन तपासले जाते. किरकोळ सर्दी-खोकला असेल तर त्वरीत औषधे दिली जातात. एखाद्याला जास्त त्रास होत असेल तर त्याची वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी करून योग्य उपचार केला जातो. कोपरगावमध्ये संशयीत रुग्ण व बाधित रुग्ण सद्यस्थित नाहीत, अशीही माहिती डॉ.फुलसौंदर व तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे.
आरोग्य पथकामध्ये वैद्यकीय अधिक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.वैशाली बडदे, डॉ. संतोष विधाटे, डॉ. संदीप वैरागर, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांचा सहभाग आहे. तर इतर अनेक डॉक्टर, आरोग्य सेवेतील कर्मचारी रुग्णवाहिका चालक, कर्मचारी यांचा मोलाचा सहभाग यात आहे. नगरपालिका, पोलीस व महसुल विभागाच्या वतीने योग्य त्या उपाययोजना राबविण्या येत आहेत. अनेक राजकीय, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते नागरीकांना विविध प्रकारे मदत करुन सामाजीक बांधीलकी जपत कोपरगाव तालुका करोनामुक्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत.