कोल्हापूर : महापुराची आपत्ती टाळता येत नसली तरी अशा आपत्तींना सामोरे जाण्याची पूर्वतयारी असली तर त्यावर मात करून जीवित व वित्तहानी टाळता येते. शहरातील आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा सज्ज आणि सतर्क आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र, कोरोनाबरोबर महापुराचा सामना करण्यासाठी दक्ष राहावे असे आवाहन आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज केले.
संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, शहरातील अनेक भागात पाणी शिरले आहे. यामुळे आमदार जाधव यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला व नागरिकांशी संवाद साधत दिलासा दिला.
आमदार जाधव म्हणाले, गेल्या वर्षी महापूर आलेल्या भागाचा यापूर्वीच दौरा केला होता, त्यावेळी नागरिकांनी अनेक अपेक्षा व्यक्त केल्या होत्या, त्या प्रशासनासमोर मांडल्या. पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याबरोबरच त्या कुटुंबांना मूलभूत सुविधेबरोबर आरोग्य सुविधा पुरविणेबाबतच्या सूचना आपत्ती व्यवस्थापनास दिल्या होत्या. त्यानुसार महापुराचा सामना करण्याची पूर्वतयारी केली होती. त्यामुळेच जीवित व वित्तहानी टाळणे शक्य झाले आहे.
आमदार जाधव यांनी पंचगंगा तालीम, शुक्रवार पेठ, मस्कुती तलाव परिसर, उत्तरेश्वर पेठ, रमण मळा, नाईक मळा, शिंदे मळा, न्यू पॅलेस मागील बाजू, कसबा बावडा रेणुका मंदिर परिसर, उलपे मळा, कागलवाडी आदी परिसरात भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला व काळजी घेऊन प्रशासनला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
पाणी उतरण्याचे संकेत
दरम्यान, पंचगंगा नदीची दुपारी 4 वाजता ४४ फूट १० इंच पाणीपातळी होती. त्यावेळी सर्वत्रच पाणी वाढेल यामुळे चिंतेचे वातावरण होते मात्र सायंकाळी 5 वाजताची पातळी ४४ फूट ९ इंच झाली. त्यामुळे पावसाने उसंत घेतली तर हळूहळू पंचगंगा नदीचे पाणी उतरेल आणि पूरग्रस्त नागरिकांबरोबच प्रशासनाची धावपळ वाचेल, असा विश्वास आमदार जाधव यांनी यावेळी व्यक्त केला.