मंचर- आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी किसानसभेच्या वतीने घोडेगाव तहसील कार्यालयावर मंगळवार (दि. 28) मोर्चाचे आयोजन केले आहे, अशी माहिती किसानसभेच्या वतीने देण्यात आली.
वनविभागाने सुरू केलेली जंगलाला कंपाउंडची कामे याबाबत स्थानिक गाव पातळीवर वनहक्क कायद्यांतर्गत स्थापन झालेली समिती व ग्रामसभा यांच्याशी चर्चा व विनिमय करून जो निर्णय होईल, तो वनविभागाने मान्य करावा, आदिवासी भागात रॉकेल नियमित मिळावे, ते बंद करू नये व पावतीवर जितकी रक्कम आहे, तितकीच रॉकेल दुकानदाराने घ्यावी, हाताला काम द्या, रोजगार हमीची कामे सुरू करणे. प्रत्येक गावाला सामूहिक वनहक्क मिळाला पाहिजे. निराधार पेन्शन योजना शासनाने मान्य केल्यानुसार 1,000 रुपयाप्रमाणे देणे सुरु करावे.
सरकारी योजनांचे लाभार्थी गावाच्या ग्रामसभेत पेसा कायद्यानुसार ठरवले पाहिजेत. 108 ची रुग्णवाहिका तळेघर येथे पूर्ववत सुरू व्हावी व तिरपाड येथे नवीन रुग्णवाहिका मंजूर व्हावी, प्राथमिक आरोग्य केंद्रात एक तरी निवासी डॉक्टर असावेत, अतिउपसा क्षेत्रात ज्या गावांची नोंद आहे, त्यांची शहानिशा करून त्या गावांची नावे रद्द करा, भरमसाठ वाढीव लाईट बिल रद्द करा, इत्यादी मूलभूत मागण्यांसाठी घोडेगाव येथील हरिश्चंद्र मंदिर येथून मोर्चाला सुरूवात होणार आहे. प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आंदोलनकर्ते मुक्काम करणार आहेत.