बॉलीवूडमध्ये नव्वदीच्या दशकात काही नवोदित कलाकार आले आणि सिनेरसिकांनी फारशी दाद न दिल्यामुळे बाहेरही फेकले गेले. यामध्ये सिनेसृष्टीतील घराणेशाहीचा वारसा असणाऱ्यांचाही समावेश होता.
संजय कपूर हा यापैकीच एक. 1995 मध्ये आलेला “राजा’ आठवतोय ना! “अखियॉं मिलाए कभी अखियॉं चुराए’ या गाण्यात माधुरी दीक्षितसोबत झळकलेला! या संजय कपूरची जास्त चर्चा झाली “सिर्फ तुम’मुळे. याखेरीज “बेकाबू’, “औजार’, “जमीर’, “डरना मना है’, “कल हो ना हो’, “एलओसी कारगिल’, “कयामत’ यांसारख्या चित्रपटातून तो झळकला खरा; पण आपली स्वतंत्र छाप उमटवण्यात त्याला यश आले नाही. नंतर निर्मितीच्या प्रांतात आणि छोट्या पडद्यावरही त्याने नशीब आजमावले. पण तरीही प्रेक्षकांनी त्याला फारसे डोक्यावर घेतले नाही.
अशा या संजय कपूरला युनायटेड किंग्डमच्या म्हणजेच इंग्लंडच्या हाऊस ऑफ कॉमन पार्लमेंटने एका भव्य समारंभामध्ये “मोस्ट इन्स्पायरिंग इंडियन बॉलीवूड ऍक्टर’ हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. साहजिकच, संजयसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट ठरली. याविषयी बोलताना तो सांगतो की, 25 वर्षांनंतर असा पुरस्कार मिळणे ही गोष्ट लोक तुम्हाला आजही पसंत करतात हे दर्शवणारी आहे. संजय म्हणतो की, मला विश्वास होता की, कधी कधी अर्ध्या तासाची एखादी छोटी फिल्मसुद्धा तुमच्या करिअरला वेगळे वळण देणारी किंवा चमत्कार घडवणारी ठरू शकते. लस्ट सिरीजने हा चमत्कार घडवून आणला आहे.