पोलीस असल्याची बतावणी ; रातोरात ठोकल्या बेड्या
पुणे : पोलिस असल्याची बतावणी करुन टोळक्याने एका तरुण-तरुणीचे अपहरण करुन सातारा येथे नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दरम्यान, पोलिसांना खबर मिळताच आरोपींचा फिल्मी स्टाईल पाठलाग करुन त्यांना अटक केली. त्यांच्या तावडीतून तरुणीची सुखरुप सुटका करण्यात आली. ही घटना वैयक्तीक वादातून झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
दत्तात्रय रामचंद्र भोईटे (वय 34, रा.वाघोली,सातारा), संदीप किसन जाधव ( 28, रा.आर्डे, सातारा) अक्षय कृष्णा दिक्षीत ( 26,रा.आर्डे,सातारा), सागर अनिल कोळेकर ( 23, रा.सुरुर, सातारा), मंगेश ,शुभम नवनाथ बरकडे ( 20), मंगेश रमेश शिंदे, 21), राहुल बाळासाहेब बरकडे ( 27, चोघेही रा. लिंब, सातारा), किरण दिलीप बाबर, 23, रा.सातारा) अशी अटक केलेल्या संशयित आरोपीची नावे आहेत.याप्रकरणी ऋतिक उत्तम मोहिते ( 27, रा. पर्वती दर्शन) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सेल्समन आहेत. ते शनिवारी सायंकाळी साडे सात वाजता त्यांच्या कार्यालयामधील तरुणीसमवेत सेनापती बापट रस्ता येथील स्टार बाजार बोलत थांबले होते. त्यावेळी त्यांच्या तेथे अचानक एक मारुती सुझुकी इरटीगा गाडी( एमएच 11 सी डब्ल्यु 9792 ) येऊन उभी राहिली. त्यातील सहा ते सात अनोळखी व्यक्तीनी फिर्यादी व तरुणीला पोलिस असल्याचे सांगुन पोलिस स्टेशनला जायचे आहे, अशी बतावणी करुन धक्काबुक्की करत गाडीमध्ये बसविले. त्यानंतर त्यांना पाषाण मार्गे चांदणी चौक ते बेंगलोर हायवेने कात्रज घाटा जवळ येथे घेवून गेले. तेथे फिर्यादीस मारहाण करुन गाडीतून खाली ढकलुन दिले यानंतर तरुणीला घेऊन गाडी साताराचे दिशेने गेली.
दरम्यान, चतु:शृंगी पोलिसांना याबाबत खबर मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखुन पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाले व त्यांच्या पथकाने तत्काळ आरोपीचा माग काढ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रविवारी पहाटे साडे तीन वाजता आरोपींना सातारा टोल नाका येथे ताब्यात घेऊन अटक केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक समीर चव्हाण तपास करीत आहेत.