पुणे – पुरंदर तालुक्यातील पानवडी गावातील खुशी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सदस्यांनी कुक्कुटपालनापासून सुरू केलेला व्यवसायाने आता दुग्ध उद्योगासारख्या मोठ्या व्यवसायापर्यंत मजल मारली आहे. शासन आपल्या दारी या योजनेतून या महिला बचत गटाला उद्योगासाठी असलेले मोठे कर्ज मिळण्यासाठी मदत झाल्याने ही प्रगती शक्य झाल्याची माहिती सदस्यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या शासन आपल्या दारी’ अभियानाच्या माध्यमातून प्रशासन गावपातळीवर पोहोचले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेलाही शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे शक्य झाले. पानवडी गावातील महिलांनी अशाच प्रकारे कुक्कुटपालनापासून सुरुवात करत दुग्धव्यवसायापर्यंत मजल मारली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून पानवडी गावातील 10 महिलांनी तीन वर्षांपूर्वी स्वयंसहायता बचत गटाची स्थापना केली.
सुरुवातीला ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून महिलांना कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण देण्यात आले. महिलांना बचत गटाच्या माध्यमातून 100 कोंबडीची पिले डिसेंबर 2022 मध्ये देण्यात आली. महिलांनी चांगल्या प्रकारे कुक्कुटपालन केल्याने आता मोठ्या कोंबड्या विक्रीसाठी तयार आहेत. त्यातून महिलांना लाभ होत आहे.
उमेद अभियानाचा फायदा…
गावातून केवळ 70 ते 80 लिटर दूध एकत्र होत असल्याने या व्यवसायाला मर्यादा येत होत्या. त्यामुळे सदस्यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून उमेद’ अभियानांतर्गत दुग्ध व्यवसायासाठी बॅंक ऑफ इंडियाकडे कर्ज प्रकरण सादर केले. बचत गटातील महिला प्रस्ताव मान्य होईल, याबाबत शंका होती. ‘शासन आपल्या दारी’ अभियानातील अधिकाऱ्यांनी महिलांचा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी आवश्यक प्रक्रिया करून घेतली. बॅंक अधिकाऱ्यांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. एक दिवस पंचायत समितीतून फोन आला आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्ज मंजुरीचा धनादेश देण्यात येणार आहे. महिलांसाठी तो सुखद धक्का होता, असे गटातील महिलांनी सांगितले.
जेजुरी येथे झालेल्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महिलांना कर्ज मंजुरीचा धनादेश देण्यात आला. दहा लाख रुपये बचत गटाच्या खात्यात वर्ग करण्यात आले. यातून गाई आणि म्हशी विकत घेऊन दुग्ध व्यवसाय वाढविणार आहोत, असा सदस्यांनी सांगितले. त्यांच्या प्रयत्नांना शासनाच्या योजनेमुळे पाठबळ मिळाल्याने महिलांचा उत्साहही वाढला आहे. एकूणच ही योजना महिलांसाठी लाभदायी ठरली आहे. शासन त्यांच्या दारी आल्याने या महिलांना व्यवसाय वाढविण्याची संधी मिळाली आहे. सामाजिक आणि आर्थिक समावेशन झाल्याने त्यांची व्यवसायातली उमेद’ही वाढण्यास मदत होणार आहे.
दुग्ध पदार्थ निर्मिती…
खुशी बचत गटातील महिला सदस्यांनी कुक्कुटपालनाच्या जोडीला गावातील दूध विकत घेऊन त्यापासून दही, लोणी, तूप, लस्सी, असे पदार्थ बनवून विक्री करण्याचे काम सुरू केले आहे.
“कर्ज प्रकरण एवढ्या सहजपणे मंजूर होईल, असे वाटले नव्हते. पण एका दिवशी पंचायत समितीतून अधिकाऱ्यांचा फोन आला आणि त्यांनी प्रकरण मंजूर झाल्याचे सांगितले. सर्व महिला सदस्य आनंदित आहेत. आता गाई-म्हशी घेतल्यावर व्यवसाय वाढविता येणार आहे. अधिकाऱ्यांनी स्वत:हून मदतीचा हात दिल्याने उत्पन्न वाढीचा मार्ग मोकळा झाला आहे.” – बचत गटातील महिला सदस्या