राहुरी – ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या गजरात भंडाऱ्याची उधळण करत खंडोबा यात्रेला सुरुवात झाली. चार दिवसाच्या यात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी अवकाळी पावसाने यात्रेत निरुत्साह केला. बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर यात्रेत दर्शनासाठी गर्दी होण्याची वेळेसच पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह रिमझिम स्वरूपातच पाऊस पडला. त्यामुळे यात्रोत्सवातील यात्रेकरूंच्या संख्येवर परिणाम झाला. त्याचा व्यावसायिक उलाढालीवरही परिणाम झाला.
पुणतांबा येथून आणलेल्या गोदावरीच्या पाण्याने शेकडो कावडीने राहुरीचे ग्रामदैवत खंडोबा महाराजांना अभिषेक करण्यात आला. नगर-मनमाड रोडवर लहान मुले तसेच माणसांनी भरलेल्या बारा गाड्या ओढण्याची किमया ऋषिकेश शेटे यांनी साधली. रविवारी सकाळी कावड भक्तांची राहुरी शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब (चाचा) तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव सदाशिव शेळके तसेच यात्रा कमिटीचे अध्यक्ष अशोक वामन, उपाध्यक्ष हरिभाऊ उंडे, आकाश येवले, खजिनदार अमोल तनपुरे, नारायण धोंगडे, राजेंद्र उंडे, नयन शिंगी, विलास वराळे, पाराजी तनपुरे, सुनील पवार,सचिन तनपुरे, दादासाहेब तोडमल, संदीप तमनर, अमोल उंडे, गोरक्षनाथ चव्हाण आदींनी स्वागत केले.
देवाच्या जलस्नानानंतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळी भंडाऱ्याची उधळण करत बारा गाड्या ओढण्यात आल्या. रात्री आठ वा. ज्योत मिरवणूक व सोगांचे आयोजन करण्यात आले होते. रात्री बारा वाजता मुळा नदीपात्रामध्ये फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.