पुणे – एकीकडे सायबर क्राइम वाढत असून, ते रोखण्यासाठी जगभरात सायबर सुरक्षा तज्ज्ञांची चणचण भासत आहे. याबाबतचा अहवाल “फोर्टिनेट’ या संस्थेने अहवाल प्रकाशित केला आहे. सध्या जगभरात जवळपास 32 लाख कुशल कर्मचारी या क्षेत्रात आवश्यक आहेत. मात्र, तुलनेने ते उपलब्ध होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
जागतिक स्तरावर आणि भारतातदेखील सायबर सुरक्षा क्षेत्रासाठी तज्ज्ञांची हजारो पदे रिक्त आहेत. जे उमेदवार आहेत, त्यांच्यात कौशल्यांची कमतरता आहे. सध्या जागतिक स्तरावर या विषयात मागणीच्या तुलनेत जवळपास 30 टक्के मनुष्यबळ पुरवठा कमी आहे.
कंपन्या गंभीर नाहीत!
अनेक आयटी कंपन्या सायबर सुरक्षेबाबत गंभीर नाहीत. असलेल्या मनुष्यबळावर ते कामाचा भार देतात. हे कर्मचारी संस्थेची उपकरणे आणि डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधतात. पण, त्यात आणखी सुधारणांची गरज आहे, असे सर्वेक्षणात म्हटले आहे.
कर्मचारी संख्या वाढवणार
भारतात पुढील 12 महिन्यांत सायबर हल्ल्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. या कंपन्यांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी सायबर कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जाईल, अशी अपेक्षा अहवालात मांडण्यात आली आहे.
“ही’ पदे महत्त्वाची
चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर-इंजिनिअर, सिक्युरिटी आर्किटेक्ट, कॉम्प्युटर फॉरेन्सिक ऍनालिस्ट, मालवेअर ऍनालिस्ट, ऍप्लिकेशन सिक्युरिटी इंजिनिअर, क्लाऊड सिक्युरिटी स्पेशालिस्ट.
आयटी क्षेत्राची अपेक्षा
फोर्टिनेट कंपनीच्या अहवालानुसार, सन 2022 मध्ये आय.टी. क्षेत्रातील 69 टक्के भारतीय संस्थांना सायबर क्षेत्राशी संबंधित मनुष्यबळाची गरज लागली. पण, त्यांना कुशल मनुष्यबळ मिळाले नाही.