मुंढवा, दि. 23 (मनोज गायकवाड) -महापालिका निवडणूक लांबल्यामुळे केशवनगरला अद्याप एकही नगरसेवक मिळालेला नाही. त्यामुळे समस्या मांडायच्या तरी कोणाकडे? याच कारणातून केशवनगरमध्ये खड्डेमय रस्ते, वाढलेली अतिक्रमणे, पाणी टंचाई, तुंबलेले ड्रेनेज आणि होणारी वाहतूक कोंडी या समस्या गेली पाच वर्षे कायम आहेत. आता, नव्याने होणाऱ्या निवडणुकीत केशवनगरसाठी स्वतंत्र नगरसेवक असावेत अन्यथा केशवनगरला पुन्हा ग्रामपंचायत द्यावी, अशी मागणी होत आहे.
केशवनगर पूर्वी शेतीचा भाग होता, आता येथे सिमेंटच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. राज्यभरातून लाख-दोन लाख नागरिक वास्तव्यास आले आहेत. या भागातील रस्ते, पाणी, वीज अशा मूलभूत गोष्टीही कमी पडू लागल्या आहेत.
महानगरपालिका वाढीव मिळकतकर घेते परंतु सुसज्ज रस्ते, मूबलक पाणी का देत नाही, असे नागरिकांचे अनेक प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत आहेत. मागील महापालिकेच्या प्रभाग रचनेत केशवनगरचे तीन तुकडे केले गेले होते. त्यामुळे पुन्हा एकदा केशवनगर नागरिकांवर अन्यायच झाला होता. केशवनगरचा विकास करायचा असेल तर केशवनगरला स्वतंत्र नगरसेवक द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. केशवनगरचा मिळकतकर एवढा मोठा असूनही तेथे प्रशासन काहीच कामे करीत नसल्याच्या तक्रारी आहेत, त्यामुळेच केशवनगरकरांच्या प्रश्नांची सोडवणूक करायची असले तर या ठिकाणी स्थानिक नगरसेवक प्रतिधीत्व असावे, अशी मागणी होत असताना महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेकडे राजकारण्यांपेक्षा नागरिकांचे अधिक लक्ष लागले आहे.