नगर – जिल्ह्यात अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून अद्यापही सुरू आहे. तर दुसरीकडे पीक विमाधारक शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रारींचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. त्यांनी नुकसान भरपारईची मागणी विमा कंपन्यांकडे केली आहे. मात्र सुस्तावलेल्या विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना तोंडाला अक्षरशः पाने पुसली आहे. महिना लोटला तरी अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही. जिल्हाभरातून तब्बल 1 लाख 3 हजार 19 तक्रारी संबंधित विमा कंपनीला मिळाल्या आहेत.
त्यानंतर नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात आहे. मात्र, आतापर्यंत फक्त 20 हजार 226 शेतकऱ्यांना जवळपास 9 कोटी 78 लाख रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळून दिलासा मिळणे गरजेचे असताना विमा कंपन्यांकडून वेळकाढूपणा केला जात असल्याचे दिसून येत आहे. कारण आता महिना होत आला तरी उर्वरित शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. सरकारचे मंत्र्यांनीही कंपन्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. कंपन्यांबाबत कठोर निर्णय घेण्याची वेळ आल्याचेही राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. तरी देखील कंपन्यांच्या कारभारात सुधारणा झालेली नाही. जिल्हाभरातून तब्बल 1 लाख पीक नुकसानीच्या तक्रारी आलेल्या असताना आतापर्यंत फक्त 20 हजार जणांनाच मदत मिळाली आहे.
केंद्र सरकारने खरीप व रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेत दिलेल्या मुदतीत शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता. नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्या मोबदल्यात भरपाई मिळते. यंदा नगर जिल्ह्याला पावसाने जोरदार तडाखा दिला. अतिवृष्टी व सतत होणाऱ्या पावसामुळे लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी नुकसानीची पूर्वसूचना घटना घडल्यानंतर 72 तासांच्या आत विमा कंपनीला कळविणे बंधनकारक केले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी या मुदतीत नुकसानीची माहिती विमा कंपनीला कळविली.
जिल्हाभरातून 1 लाख 3 हजार 19 नुकसान पूर्वसूचना विमा कंपनीला मिळाल्या आहेत. यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 83 हजार 336 आणि काढणी पश्चात 19 हजार 683 तक्रारींचा समावेश आहे. यानंतर पीक नुकसानीचे नुकसानीचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव कंपनीला सादर करण्यात येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 20 हजार 226 शेतकऱ्यांनाच भरपाई मिळाली आहे. आणखीही हजारो शेतकरी भरपाई मिळण्याची वाट पाहत आहेत.