मुंबई– श्रीलंका संघाचे प्रशिक्षक व अन्य एक खेळाडू करोनाबाधित असल्याने संपूर्ण संघालाच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मात्र, यावर बीसीसीआय समाधानी नसून त्यांनी हे खेळाडू खेळू शकले नाहीत तर मालिका रद्द होऊ नये यासाठी बॅकअप संघ (सेकंड बेंच) तयार ठेवण्याचा इशाराही दिला आहे.
भारत व श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला 18 जुलैपासून प्रारंभ होत आहे. श्रीलंका क्रिकेट संघातील सपोर्ट स्टाफ किंवा खेळाडूंची संख्या करोनाबाधितांमध्ये वाढली तर पर्याय म्हणून बॅकअप संघ तयार राहील.
श्रीलंकेचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रॅंट फ्लॉवर आणि सपोर्ट स्टाफमधील जीटी निराशेन या दोघांना करोनाची बाधा झाली आहे. त्यानंतर श्रीलंका क्रिकेट मंडळाने मालिकेचे वेळापत्रक बदलण्याची केलेली विनंती बीसीसीआयने मान्य करत सामन्यांच्या तारखांमध्ये बदल केला. बीसीसीआयने श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंचे हॉटेल बदलण्यात यावे अशी मागणी केली होती. या मागणीनंतर श्रीलंकेच्या सर्व खेळाडूंना कोलंबोतील ग्रॅंड सिनामन हॉटेलमध्ये नेण्यात आले व तिथेच ते विलगीकरणात राहात आहेत.
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्या मालिकेचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार 18 जुलै रोजी पहिला एकदिवसीय सामना होणार असून दुसरा सामना 20 जुलै तर, तिसरा सामना 23 जुलै रोजी होईल. टी-20 मालिकेतील पहिला सामना 25, दुसरा सामना 27 तर, तिसरा सामना 29 जुलै रोजी होणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमध्ये खेळवले जातील.