मुंबई – ‘बाईपण भारी देवा’ आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकीच्या विश्वाभोवती फिरणाऱ्या आई, आजी, सासू, काकी, मावशी, ताई, आत्या अशा साऱ्यांच्या भावना शेअर करणारा आहे. अर्थात चित्रपटाचं कथानक महिलांभोवती फिरणारं असलं तरी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक पुरुषालाही हा चित्रपट बरंच काही सांगून जाणार आहे. यामुळेच संपूर्ण महिला वर्गाला या चित्रपटाचे प्रचंड आकर्षण आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी याबाबतचे आपले काही अनुभव सांगितले आहेत. ज्यामध्ये अनेक महिला त्यांना थेट इंस्टाग्रामवर मेसेज करत असल्याचे ते म्हणतात.
चित्रपटात सहा बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. काही कारणामुळे एकमेकींपासून विभक्त झालेल्या आणि स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात वेगवेगळ्या समस्यांना सामोऱ्या जाणाऱ्या या सहा बहिणींची कथा म्हणजे सर्वसामान्य आयुष्यातील सुपर वुमनची कथा आहे. यामुळेच हा चित्रपट प्रत्येक महिलेला आपली कहाणी वाटतो. नुकतंच या चित्रपटाच्या टीमने जंगी सेलिब्रेशन केलं. यादरम्यान प्रत्येकाने आपले अनुभव सांगितले. दिग्दर्शक केदार शिंदेंच्या देखील चित्रपट प्रदर्शनानंतर त्याला सोशल मीडियावर येणाऱ्या मेसेजबाबत सांगितलं.
केदार शिंदे म्हणाले,“आता मला बायका त्यांच्या समस्या इन्स्टाग्रामवर मेसेज करून सांगतातत्यांची इच्छा असते की, मी याच्यावर काहीतरी उत्तर द्यावं. आता मी त्यांचा कौंसिलर झालोय असं शिंदे म्हणतात. तसेच मी त्यांच्यासाठी एवढा हक्काचा माणूस झालो असेल तर त्याचं सगळं श्रेय हे बाईपण भारी देवाच्या टीमला जातं असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
30 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, चित्रपटानं प्रदर्शना आधीपासूनच प्रेक्षकांमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता.सध्या या चित्रपटाला सिनेरसिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, थिएटरमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. केवळ पाच कोटींचे बजेट असणाऱ्या या चित्रपटानं आतापर्यत तब्बल 50 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.