कात्रज – कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून मंजूर झालेले 200 कोटी रुपये अद्याप महापालिकेला मिळाले नसल्याने भूसंपादन रखडले आहे. हे काम करण्यासाठी ऑक्टोबरपूर्वी जागा ताब्यात घेण्याचे नियोजन असताना निधीच उपलब्ध झालेला नसल्याने हे काम पुन्हा रेंगाळले आहे.
कात्रज-कोंढवा रस्ता 32 मीटरचा असून वाढत्या वाहतुकीमुळे तो अरूंद ठरत आहे. यामुळे महापालिकेने 84 मीटरपर्यंत रस्ता रुंदीकरणाचा निर्णय घेतला आहे. परंतु, भूसंपादनाअभावी गेल्या पाच वर्षांत केवळ 28 टक्के काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यात ज्यांच्या जमिनी जात आहेत, त्यांनी पालिकेकडे रोख नुकसान भरपाई मागितलेली आहे. “टीडीआर’, “एफएसआय’च्या रुपात मोबदला घेण्यास संबंधीत जागा मालकांनी नकार दिला आहे.
महापालिकेला या प्रकल्पासाठी 2 लाख 88 हजार चौरस मीटर जागा आवश्यक असून अद्याप 1 लाख 28 हजार चौरस मीटर जागेचे भूसंपादन झालेले नाही, याच कारणातून हे काम ठप्प आहे. जागामालकांना रोख मोबदला देता यावा, यासाठी महापालिकेने 84 मीटरऐवजी 50 मीटरचा रस्ता विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.
कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपदनासाठी 200 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. जागामालकांची यादीही तयार केली आहेत. पैसे मिळताच भूसंपादनाची प्रक्रिया ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केली जाईल. त्यानंतर रस्त्याचे काम सुरू होईल. पुढील काही महिन्यांत कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरणाचे काम पूर्ण होऊ होईल, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले.