– जयंत माईणकर
ज्यांच्या नेतृत्वाखाली रथयात्रा काढली त्या लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न दिल्यानंतर त्यावेळी पंतप्रधान असलेल्या नरसिंह राव यांनाही भारतरत्न दिला जाणे हा निव्वळ योगायोग की घडवून आणलेला योगायोग?
1991 साली देशाचं सोनं गहाण ठेवून आर्थिक घडी बसविण्याचे प्रयत्न सुरू असतानाच राजीव गांधींच्या हत्येमुळे ‘अपघाताने’ नरसिंहराव पंतप्रधान झाले. सत्तेवर आल्या आल्या त्यांच्या काळात घडलेल्या दोन घटना महत्त्वाच्या आहेत. त्यातली पहिली घटना म्हणजे आर्थिक उदारीकरण आणि परकीय गुंतवणूक देशात आणण्याचं धोरण देशात विकासाचं युग निर्माण करणारी ठरली, तर दुसरी बाबरी मस्जिद पाडण्याची घटना भाजपला बळ देणारी ठरली. ‘अबकी बार चारसो पार’ या 2024 च्या घोषणेचे मूळ या घटनेत आहे. देशातील काँग्रेसच्या अर्थात नेहरू-गांधी घराण्याच्या र्हासाला जबाबदार असलेली घटना! आणि ही घटना घडण्यास नरसिंह राव यांनी एक प्रकारे मदतच केली, असे मानणारा एक मोठा वर्ग आहे.
नेहरू-गांधी घराण्याच्या विरुद्ध अनेक व्यक्तींनी आवाज उठवला. पण त्यातल्या दोन व्यक्तींनी या घराण्याला दिलेल्या त्रासातून ते घराणे आजही बाहेर पडलेले नाही. काँग्रेसमधून बाहेर पडून राजीव गांधी यांना पहिले आव्हान दिलं होतं विश्वनाथ प्रताप सिंग यांनी. बोफोर्स तोफ खरेदी प्रकरणातील लाच कोणाला दिली हा मुद्दा काढून! 20 वर्षांनंतर ते प्रकरण संपलं. आरोपात काहीही निघालं नाही. मात्र राजीव गांधी संपलेले होते. दुसरं आव्हान दिलं होतं शरद पवार यांनी सोनिया गांधी इटालियन असल्याचा मुद्दा काढून त्यांनी पंतप्रधान बनण्याला विरोध करत! 1999 साली पवारांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. सोनिया गांधी पंतप्रधान पदापासून वंचित राहिल्या. सिंग आणि पवार हे काँग्रेसमधून बाहेर पडले होते.
नरसिंह राव यांची गोष्टच वेगळी. काँग्रेसमध्येच राहून एकाच वेळी पक्षाचं अध्यक्षपद आणि पंतप्रधानपद भूषवत नेहरू-गांधी परिवाराच्या पावलावरच आपण पाऊल टाकत आहोत असं सांगत त्यांनी बाबरी पडू देण्यास एक प्रकारे मदतच केली असं मानणारा एक मोठा वर्ग काँग्रेसमध्येही आहे. आणि म्हणूनच की काय नरसिंह राव यांचा अंत्यविधी दिल्लीत होऊ न देता हैद्राबादमध्ये केला गेला. बाबरी घटनेला या डिसेंबर महिन्यात 32 वर्षे पूर्ण होतील. त्यापैकी 16 वर्षे भाजप सत्तेत आहे.
बाबरीविषयी जेवढी टीका नरसिंह राव यांच्यावर होते तेवढीच किंवा त्याहून जास्त स्तुती नरसिंह राव यांची केली जाते ती आर्थिक उदारीकरण आणि परकीय गुंतवणुकीच्या निर्णयासाठी! नेहरू-इंदिरा-राजीव यांच्या काळात सोव्हिएत युनियनकडे झुकलेल्या देशाला अमेरिकेच्या बाजूने नेण्याचे काम या निर्णयाने सुरू झाले. त्याआधीच सोव्हिएत युनियनचे पंधरा तुकड्यात विभाजन झाले होते आणि रशिया तेवढा ताकदवान नव्हता.
नेमक्या या परिस्थितीचा फायदा घेत नेहरूंच्या काळातील उद्योगांचे सरकारीकरण या नीतीच्या विरोधात जात खासगीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्याचे फायदे देशाला मिळाले. आर्थिक मंदी, नोटाबंदी, करोना यासारख्या आर्थिक हानी करणार्या घटना घडल्यानंतरही आज देश उभा आहे याचे कारण नरसिंह राव यांच्या काळात बिघडलेली आर्थिक घडी सुधारण्यास झालेली सुरुवात! भाजप नरसिंह राव यांना मानतो. बाबरी पाडण्यास अप्रत्यक्ष मदत करण्यासाठी आणि अमेरिकेच्या जवळ नेण्यासाठी मानतो. भारतरत्न हे त्याचंच फळं?
कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देऊन बिहारमध्ये नितीशकुमार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या बाजूला वळवले, तर माजी पंतप्रधान चरणसिंग यांना भारतरत्न देऊन त्यांचा नातू आणि राष्ट्रीय लोकदल या पक्षाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांना आपल्या बाजूला वळवण्यात त्यांना यश आले आहे. पश्चिम उत्तर प्रदेश या भागात आजही चरणसिंग यांना मानणारा वर्ग आहे. एक प्रकारे बिहारप्रमाणेच उत्तर प्रदेशातही इंडिया आघाडीला सुरूंग लावण्यात मोदी यशस्वी ठरले आहेत.
एमएस स्वामिनाथन हे कृषितज्ज्ञ तामिळनाडूचे! त्यांचा मृत्यू गेल्या वर्षी झाला. पण मोदींनी गेल्या नऊ वर्षांत त्यांचा भारतरत्नसाठी विचार केला नाही. मात्र निवडणुकीच्या तोंडावर त्यांना भारतरत्न देऊन तामिळनाडूमध्ये भाजपला सहानुभूती मिळविण्याचा हा प्रयत्न! जसा नरसिंह राव यांना भारतरत्न दिल्याचा फायदा भाजपला आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये होऊ शकतो. पंजाबमधील शेतकर्यांच्या आंदोलनात केंद्र सरकारची नाचक्की झाली. आज शेतकर्यांच्या फायद्याचे निर्णय घेणार्या स्वामिनाथन यांना भारतरत्न देऊन शेतकर्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न होत आहे.
आतापर्यंत 53 गणमान्य व्यक्तींना भारतरत्न देण्यात आला आहे, त्यापैकी बर्याच जणांना मरणोत्तर! पहिला मरणोत्तर भारतरत्न मिळाला लाल बहादूर शास्त्री यांना. नोबेल पारितोषिक कधीही मरणोत्तर दिले जात नाही. तीच पद्धत इथेही असावी असं वाटतं! कारण मरणोत्तर भारतरत्न देऊन त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. आधीच्या सरकारने या नेत्यांकडे कसं दुर्लक्ष केलं याची गाथा ऐकवली जाते. आताही मोदी तेच करणार आहेत. मरणोत्तर देत नसत पण शस्त्रीजींसाठी नियमात बदल करून त्यांना प्रथम दिले गेले.
नेताजी बोस यांना 1992 साली घोषित केलेले भारतरत्न दिले नाही कारण ते मृत्यू पावले नाहीत अशी भूमिका भाजपने व नेताजी यांचे भारतातील नातेवाईक यांनी त्यावेळी घेतली.