मुंबई :- देशांतर्गत स्पर्धेतील मानाची मानली जात असलेली रणजी करंडक स्पर्धा सुरु असताना तसेच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याची सुचना केलेली असतानाही इशान किशनने आतापर्यंत एकही रणजी स्पर्धेचा सामना खेळलेला नाही. त्यामुळे बीसीसीआय प्रचंड संतप्त असून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही संकेत मिळाले आहेत.
इशान किशनला भारतीय संघात स्थान देण्यात न आल्यामुळे तो निराश झाला होता असे सांगितले गेले. तसेच त्याने सतत खेळत असल्यामुळे काही काळ विश्रांतीची मागणी केली होती. ही मागणी मान्य करताना बीसीसीआयने त्याला जर संघात परतायचे असेल तर देशांतर्गत स्पर्धेत कामगिरी सिद्ध करावी लागेल असेही सुचित केले होते. तसेच द्रविड यांनीही त्याला हाच सल्ला दिला होता मात्र, इशानने यंदाच्या मोसमात सुरु असलेल्या रणजी स्पर्धेचा अद्याप एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे त्याच्या संघातील पुनरागमनापेक्षा आता त्याच्यावर होऊ घातलेल्या कारवाईची चर्चा सुरु आहे.
बीसीसीआय भारतीय क्रिकेटपटूंना एक संदेश पाठवण्याच्या तयारीत आहे. जे खेळाडू आता सध्या भारतीय संघाचा भाग नाहीत किंवा रणजी करंडक स्पर्धेसारख्या महत्त्वाच्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळत नाहीत. अशा खेळाडूंवर बीसीसीआयने नाराजी तसेच संतापही व्यक्त केला आहे. लवकरच अशा खेळाडूंना बीसीसीआय आदेश जारी करणार असल्याचेही बोलले जात आहे. किशनला संघात परतायचे असेल तर त्याला रणजी ट्रॉफी क्रिकेट खेळावे लागेल. मात्र, इशानने अद्याप एकही रणजी सामना खेळलेला नाही. काही दिवसांपूर्वी इशान हार्दिक व कृणाल या पंड्या बंधूसह मोरे अकादमीत सराव करत असल्याचेही वृत्त आले होते. मात्र, ही तयारी रणजी करंडकासाठी नसून आयपीएलसाठी असल्याचे समोर आल्यावर बीसीसीआयने इशानसह सगळ्याच अशा खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धेत खेळणे बंधनकारक केले जाइल असेही सुचित केल्याचे संकेत आहेत.
पुढील काही दिवसांत सर्व खेळाडूंना रणजी स्पर्धेत त्यांच्या राज्य संघाकडून खेळण्यासाठी बीसीसीआयकडून कळवले जाईल. जे खेळाडू तंदुरुस्त नवसतील व राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) तंदुरुस्तीवर काम करत असतील तर त्यांना सूट देण्यात येणार आहे. कोणत्याही खेळाडूंची नावे उघड करण्यात आली नसली तरी आयपीएल स्पर्धेला जास्त महत्व देत असलेले खेळाडू रडारवर आहेत हे निश्चित मानले जात आहे.
IND vs ENG 3rd Test : राजकोट कसोटीमध्ये ‘हा’ युवा खेळाडू करू शकतो पदार्पण, केएस भरतला मिळणार डच्चू….
द्रविडचे न एकणे भोवणार
राहुल द्रविड यांनी दिलेला सल्ला धूडकावून क्रिकेटपासून दूर राहात असलेल्या शान किशनवर कारवाई झाली तर तो सर्वच खेळाडूंसाठी एक स्पष्ट संदेश असेल. संघात परत यायचे असेल तर कामगिरी सिद्ध करावीच लागेल व त्यासाठी रणजी स्पर्धेत खेळावेच लागेल, असे आता इशानला स्पष्टपण सांगण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जर तो रणजी करंडक स्पर्धेत खेळला नाही तर त्याच्यावर कारवाई होणार असेच चित्र दिसत आहे. द्रविड यांनी दिलेला सल्ला न एकणेच इशानला भोवणार आहे.