– हेमंत महाजन
यावर्षीचे जिओसी इन सी ईस्टर्न कमांडचे युनिट साइटेशन हे 21 पॅरा स्पेशल फॉर्सेस या बटालियनला देण्यात आले. हा लेख त्यांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकविषयी आहे, जो अत्यंत धोकादायक होता.
14 जानेवारीला आर्मी डे हा वेस्टर्न कमांड मध्ये साजरा करण्यात आला. या दिवशी पराक्रम गाजवलेल्या सैनिकांना आणि युनिट्सना शौर्य पुरस्कार आणि युनिट साइटेशनने गौरवण्यात येते. युनिट साइटेशन हे युनिट्ने गेल्या काही वर्षातील केलेल्या अत्यंत पराक्रमी दहशत विरोधी कारवाईकरिता दिले जाते. यंदा हे 21 पॅरा स्पेशल फॉर्सेस या बटालियनला देण्यात आले. 21 पॅरा स्पेशल फॉर्सेसचे अनेक सैनिक हे मराठा असतात आणि ते मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचा भाग आहेत.त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन आपले टोपण नाव वाघ नखं असे ठेवले आहे.
दहशतवादी तळावर हल्ला
21 पॅरा स्पेशल फॉर्सेसने म्यानमारच्या आत घुसून पीपल्स लिबरेशन आर्मी या मणिपूर खोर्यातील दहशतवादी असलेल्या गटाच्या तळावर हल्ला केला आणि त्यांचे अनेक दहशतवादी मारले. ही एक अत्यंत कौतुकास्पद कारवाई आहे, कारण या दहशतवादी गटाने मागच्या वर्षी आसाम रायफलचे कमांडिंग ऑफिसर कर्नल त्रिपाठी, त्यांची पत्नी, सहा वर्षांच्या मुलगा आणि चार इतर जवानांना मारले होते.
मणिपूरमधील प्रमुख बंडखोर गटांपैकी एक पीएलए 1970 पासून भारतापासून अलिप्त होण्यासाठी लढा देत आहे. तिबेटची राजधानी ल्हासाजवळील लष्करी छावणीत याच्या संस्थापकांना चिनी सैन्याने मूलतः प्रशिक्षण दिले होते.
म्यानमार सैन्य तत्माडॉ आता सशस्त्र बंडाच्या रूपात आपल्या घरगुती अशांतता हाताळण्यात व्यस्त आहे. अलीकडच्या काही महिन्यांत काचिन सारख्या राज्यामध्ये जंटा सैन्यावर आणि लष्करी प्रतिष्ठानांवर अनेक हल्ले सुरू आहेत. म्यानमार सीमेवरती अत्यंत घनदाट जंगल आहे आणि जंगलाच्या आत दहशतवादी गटांचे कॅम्प असतात.तिथे म्यानमार सैन्याचा फारसा प्रभाव नाही. तिथे जाणे अत्यंत धोकादायक होऊ शकते, कारण प्रत्येक कॅम्पच्या आजूबाजूला आणि येण्या-जाण्याच्या रस्त्यावरती तिथल्या दहशतवादी गटांचे लक्ष असते. जंगल घनदाट असल्यामुळे दहशतवाद्यांशी समोरासमोर मुकाबला झाला तर,
आपल्याला सहाय्य करायला इतर सैन्याची येण्याची शक्यता फारच कमी असते. यायच्या व जायच्या रस्त्यावरती माइन्स म्हणजे सुरूंग लावले असतात, त्यामुळे जखमी होण्याचा मोठा धोका असतो.
अशा धोक्याला सामोरे जाऊन दहशतवादी गटाच्या तळावरती हल्ला करणे हे अत्यंत शौर्यपूर्ण काम होते. या दहशतवादी तळावरती कर्नल त्रिपाठी यांच्यावर ज्यांनी हल्ला केला होता, त्यातले अनेक दहशतवादी नेते मारले गेले.अशा क्रूर दहशतवाद्यांना मारून आपण पीएलए या दहशतवादी गटाला मोठा धडा शिकवला आहे.
अत्यंत मानसिक दबावाखाली
21 पॅरा स्पेशल फॉर्सेसचे हे काम अजून जास्त कौतुकास्पद आहे कारण त्यांच्यावरती नागालँड सरकार आणि पोलीसने खटला चालवण्याची तयारी सुरू केलेली आहे. यामुळे 21 पॅरा स्पेशल फॉर्सेस अत्यंत मानसिक दबावाखाली होती. अशा परिस्थितीमध्ये एक नवे ऑपरेशन आणि तेही म्यानमारच्या आत घुसून यशस्वीरित्या पार पाडणे, हे अत्यंत पराक्रमी कृत्य समजले पाहिजे. नागालँड सरकारने एक मोठा प्रपोगंडा चालवला होता, की 21 पॅरा स्पेशल फॉर्सेसने नागालँडच्या निरपराध नागरिकांना कू्ररपणे ठार मारले जे की पूर्णपणे असत्य होते. अनेक वेळा या राज्यातील राजकारणी हे जास्त सैनिकी विरोधी कारवाया करतात आणि दहशतवादी कृत्यांविषयी काहीही बोलत नाही.
त्या प्रकरणाचा थोडासा इतिहास
नागालँडमधील मोन जिल्ह्यातील तिझित परिसरातील ओटिंग गावाजवळ अतिरेक्यांच्या घुसखोरीची माहिती मिळाल्यानंतर लष्कराच्या 21 पॅरा एस एफ तयार झाले. संशयित अतिरेकी समजून वाहनाला थांबविण्याचा आदेश देण्यात आला; मात्र वाहन न थांबल्याने, भरधाव पुढे गेल्याने त्यांनी वाहनावर गोळीबार केला. त्यात 8 पैकी 6 जण ठार झाले. ते सर्व खाण कामगार होते, हे लक्षात येताच त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात भरती केले. त्यांनी गैरसमजातून मजुरांवर गोळीबार केला, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेच्या दोन्ही सदनात निवेदनाद्वारे सांगितले होते.
त्यानंतर काही गावकरी 21 पॅरो कमांडोंवर शस्त्रासकट चालून आले. स्वसरंक्षणाकरता केलेल्या फायरिंगमध्ये पुन्हा सहा नागरिक ठार झाले. त्याशिवाय एक जवान ठार झाला. अनेक जण जखमी झाले. लष्कराची 21 पॅरा कमांडो युद्ध युनिट आहे. 2015 मध्ये ‘ऑपरेशन हॉट परस्यूट’ अंतर्गत म्यानमारच्या आत घुसून आतंकी शिबिर उद्ध्वस्त केले होते. गुप्तहेरांकडून एनएससीएन(के)चे बंडखोर ओटिंग गावाजवळून जाणार होते, अशी सूचना होती. त्यामुळे ते सापळा रचून वाट पाहत होते. परंतु त्यांच्या हातून ‘चुकीच्या ओळखी’मुळे सामान्य मजूर; जे बोलेरो गाडीतून घराकडे जात होते, ते मारले गेले.
ईशान्येत वावरणार्या आसाम रायफल्स व भारतीय सैन्यावर प्रचंड ताण असतो. म्यानमारला लागून असलेल्या नागालँडच्या मोन जिल्ह्यात Aआफ्स्पा अॅक्ट लागू आहे. यामुळे केंद्र सरकारची परवानगी न घेता लष्कराविरोधात गुन्हा दाखल केला गेला जाऊ शकत नाही. पण नागा पोलिसांनी स्वतःहून भारतीय लष्कराच्या विशेष दलाच्या तुकडीविरोधात हत्येची तक्रार दाखल केली.
फायटिंग स्पिरिट कौतुकास्पद
मात्र 21 पॅरा स्पेशल फॉर्सेसने याआधी आलेल्या अपयशाची परवा न करता पुन्हा एकदा म्यानमारमध्ये दहशतवादी गटावरती हल्ला करून त्यांना एक मोठा धक्का दिला. त्यांचे फायटिंग स्पिरिट हे कौतुकास्पद आहे. लष्करी अधिकारी-जवान हेसुद्धा या देशाचे नागरिक आहेतच. त्यामुळे कोणाही नागरिकाला आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध न्यायालयाकडे दाद मागण्याचा जो अधिकार असतो, तो त्यांनाही आहेच.
जंगलातील जीवन-मरणादरम्यान लोंबकळणार्या अशा युद्धाचे पोस्टमॉर्टम वातानुकूलित अभ्यासिकांमध्ये दिवाणखान्यात करून जवानांना गुन्हेगाराच्या पिंजर्यात उभे करण्याच्या छंदात काही राजकारणी, पोलीस, मानवाधिकार कार्यकर्ते मग्न असतात. त्यांना जखमी आणि मरण पावलेल्या सैनिकांच्या ‘मानवी हक्का’ची तसूभरही चिंता नसते. जो देश सैनिकांचे रक्षण करत नाही, त्या देशाची सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात पडते. 21 पॅरा स्पेशल फॉर्सेसने केलेल्या कारवाईबद्दल त्यांचे कौतुकच करायला पाहिजे आणि अशा करूया की येणार्या काळामध्येसुद्धा ते अशाच प्रकारची चमकदार कारवाई करत राहतील.