पुणे – भारताचे नंदनवन म्हणवणाऱ्या काश्मीरमधील पर्यटन आजही सर्वाधिक सुरक्षित आहे. केंद्र सरकारतर्फे 370 कलम हटवल्यानंतर थोडा परिणाम पर्यटनावर झाला होता. मात्र, आता येथील पर्यटन नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरू आहे. येत्या काळात त्यात बदल होऊन आणखी पर्यटन वाढेल, असा विश्वास काश्मीरमधील पर्यटन आणि हॉटेल व्यावसायिकांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
काश्मीरमधील पर्यटनाबाबत जनजागृती करण्यासाठी पहलगाम हॉटेल ऍड रेस्टॉरंट असोसिएशनतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी असोसिएशनचे असिफ बुरझा, शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कनव्हेशनल सेंटरचे अध्यक्ष जावेद बक्शी, पुणे ट्रॅव्हल्स् असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास केळकर, सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, बहराम पशतुनाझदेह उपस्थित होते.
बुरझा म्हणाले की, काश्मीरमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. यात महाराष्ट्रातील पर्यटकांची संख्या जास्त आहे. गेल्या वर्षी जवळपास 50 हजारांपेक्षा जास्त पर्यटन काश्मीरला आले होते. त्यात पुण्यातील पर्यटक सर्वाधिक होते. संपूर्ण राज्यात अनेक पर्यटनस्थळांना मोठ्या प्रमाणात पर्यटक भेटी देत असतात. तिन्ही ऋतुमध्ये पर्यटक विविध ठिकाणी भेटी देत असतात. यात ऐतिहासिक, धार्मिक स्थळांबरोबर निसर्गरम्य ठिकाणेही आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सोलो ट्रिप करणाऱ्या पर्यटकांमध्येही वाढ झाली आहे. काश्मीरबाबत माध्यमांमध्ये येणारे चित्र चुकीचे आहे. हिंसाचाराच्याच बातम्यांना प्राधान्य दिले जाते. काश्मीरमध्ये आल्यावर पर्यटकांना याची प्रचिती येते. 370 कलम हटवल्यानंतर काही दिवस पर्यटनावर परिणाम झाला. मात्र, परिस्थीती आता बदलत आहे. पर्यटनावर याचा कितपत परिणाम झाला याबाबत आता काही सांगता येणार नाही. मात्र, पर्यटन मंत्रालयानुसार काश्मिरीमध्ये पर्यटन विकासाला चालना दिली जात असून याचा चांगला परिणाम दिसत आहे.