आयआयटी प्रवेश परीक्षा : राज्यातील अन्य दोघे “टॉप टेन’मध्ये
पुणे – आयआयटी प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या जेईई ऍडव्हान्स या प्रवेश परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत चंद्रपूरच्या बल्लारपूर येथे राहणारा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला आला आहे. त्याला 100 पर्सेंटाइल मिळाले आहेत.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुडीकेतर्फे जेईई ऍडव्हान्स परीक्षा घेण्यात आली होती. जेईई ऍडव्हान्स परीक्षा 27 मे रोजी झाली होती. या परीक्षेला देशभरातून 1 लाख 61 हजार 319 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 38 हजार 795 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अहमदाबाद येथील शबनम सहाय 372 पैकी 308 गुण मिळवून मुलींमधून प्रथम आली आहे. पहिल्या पाच मुलींमध्ये मुंबईच्या तुलीप पांडे हिने स्थान मिळवून तिसरा क्रमांक मिळविला आहे.
दरम्यान, यापूर्वी कार्तिकेय हा जेईई मेन परीक्षेत 100 पर्सेंटाइल मिळवून तो देशात अठरावा, तर महाराष्ट्रात दुसरा आला होता. कार्तिकेयने बारावीच्या परीक्षेत 93.7 टक्के गुण मिळविले आहेत. तो मुंबई येथे प्रवेश परीक्षेची पूर्वतयारी केली होती. तेथूनच त्याने ही परीक्षा दिली होती. कार्तिकेय अवघ्या 17 वर्षांचा असून त्याने जेईई ऍडव्हान्स परीक्षेत 372 पैकी 346 गुण मिळविले आहेत. कार्तिकेयचे वडील चंद्रेश गुप्ता पेपर इंडस्ट्रीमध्ये मॅनेजर असून आई पूनम या गृहिणी आहेत.
जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल लागल्यानंतर कार्तिकेयने आनंद व्यक्त केला. “निकाल चांगला लागेल हे माहिती होते. पण देशातून पहिला येईल, असे वाटले नव्हते. असे सांगत नियोजनपूर्वक परीक्षेची तयारी केली होती. नियमित क्लासला जाण्याबरोबरच 6 ते 7 तासांचे शेड्यूल तयार करून अभ्यास केल्यानेच हे यश मिळाले,’ अशा शब्दांत कार्तिकेयने आपल्या भावना व्यक्त केल्या.
देशातील 10 टॉपर
कार्तिकेय गुप्ता (महाराष्ट्र), हिमांशू गौरव सिंह (दिल्ली), अर्चित बुबना (दिल्ली), गिलेला आकाश रेड्डी ( हैदराबाद), बत्तीपति कार्तिकेयन (हैदराबाद), निशांत अभंगी (दिल्ली), कौस्तुभ दिघे (महाराष्ट्र), थिवेश चंद्र एम (हैदराबाद), ध्रृवकुमार गुप्ता (दिल्ली) आणि शबनम सहाय (महाराष्ट्र).