कर्जत : येथील नगरपरिषद हद्दीतील दहिवली प्रभागात समस्यांनी मोठ्या प्रमाणात घेराव घातला असून, त्या समस्या सोडविण्याकडे नगरपरिषद का कानाडोळा करीत आहे? नक्की दहिवलीकरांच्या समस्या, प्रश्न सोडविले जात नाहीत, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. जर दहिवलीमधील समस्या सोडविले गेले नाही, तर नारीशक्ती यावर आवाज उठविणार आहे.
समर्थ नगर, राष्ट्रवादी भवन, पाटील आळी, कोकण आळी, इंदिरानगर, गुरव आळी, सोनार आळी, ब्राह्मण आळी, साईनगर, संजयनगर, बौद्धवाडा, सेवालाल नगर, सहकारनगर तसेच दहिवलीमध्ये गटारे स्वच्छ केली नसल्याने त्यामध्ये जंगली झाडेझुडपे वाढून मातीचा ढिगारा साचल्याने पाण्याचा प्रवाह खंडित झाला आहे. त्यामुळे गटाराचे पाणी रस्त्यावर येत आहे. या भागात रुग्णालय असल्याने तेथील रुग्णांना डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. सांडपाण्याचा दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तसेच भिंत दुरुस्तीच्या नावाखाली मोठमोठे खड्डे खोदून ठेवले, मात्र ते अद्यापपर्यंत बुजविण्यात आले नाहीत, हे खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहे. तसेच बच्चूभाई गिरणीपासून रस्ता अनेक वर्षांपासून नव्याने करण्यात आला नाही. त्यामुळे पावसाळ्यात खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने तेथे अपघातही वारंवार घडत आहे.
गटारभोवती जंगली गवत, झाडेझुडपी काढण्यात आलेली नाही हे विदारक चित्र दिसून येत आहे. कचऱ्याचा ढीग, राष्ट्रवादी भवनसमोर अनधिकृत हातगाड्या, गाळे उभारले जात आहे.
तसेच काही दुकानदारांनी अर्धा रस्ता व्यापला आहे. असे एक ना अनेक समस्या असून, अद्यापपर्यंत का सुटली गेली नाही, असा प्रश्न दहिवलीकरांना सतावत आहे. नक्की विकास कुठे झाला.? कोणता केला याचा जाब नारीशक्तीने उपस्थित केला आहे. या समस्यांचे निराकरण ऑगस्ट महिन्यात करण्यात आले नाही, तर नारीशक्ती महिला यावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला आहे.
करोना संसर्ग सुरू झाल्यापासून निर्जंतुकीकरण करण्यात आले. त्यांनतर एकदाही या भागाकडे पाहिले नाही, तसेच करोनाचे कारण पुढे करून डास फवारणी ही केली नाही. त्यामुळे आता मलेरिया, टायफाईड सारखे आजार उद्भवत आहे.
– वृषाली शिंदे, नागरिक, दहिवली