वाई, (प्रतिनिधी) – येथील लोकमान्य टिळक संस्थेच्यावतीने आयोजित 108 व्या वसंत व्याख्यानमालेचे उद्घाटन उत्साहात झाले. ‘पानिपत ते महासम्राट शिवाजी’ या विषयावर ‘पानिपत’कार विश्वासराव पाटील यांनी प्रथम पुष्प गुंफले. डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी अध्यक्षस्थान भूषविले. विश्वास पाटील म्हणाले, महाराष्ट्रात पाटील हे उसाच्या, कुस्तीच्या अथवा तमाशाच्या फडामुळे ओळखले जातात.
मात्र, मी केवळ शब्दांच्या फडात रमलो. मराठ्यांच्या धवल यशाची आणि विश्वासक अपयशाची कहाणी म्हणजे पानिपत आहे. त्यामुळेच मी या विषयाकडे आकर्षित झालो आणि हा संपूर्ण इतिहास मराठी वाचकांसमोर मांडण्याची प्रेरणा मिळाली. दत्ताजी शिंदे, अहमदशाह अब्दाली, भाऊसाहेब यांच्या तोंडच्या संवादांचा विचार करताना माझ्या अंगावर रोमांच उभे रहात होते. माझ्या ऐतिहासिक कादंबर्यांवर आधारित चित्रपट व मालिकांमध्ये योग्य इतिहास दाखवला जात नाही. तो मराठी रसिकांसमोर मांडणे गरजेचे आहे.
त्यांच्या पानिपत, झाडाझडतीपासून ते महानायकमधील सुभाषचंद्र बोस यांच्या व्यक्तिमत्वाचा उलगडा त्यांनी केला. सुभाषचंद्र बोस यांचे जपानमधील वास्तव्य, तेथील लोकांची त्यांच्यावर जडलेली श्रद्धा, युद्धकाळात जपानने त्यांना केलेली सैनिकी मदत, त्यांचे देशप्रेम यांचे विश्लेषण पाटील यांनी केले.
‘महासम्राट शिवाजी’ या त्यांच्या कादंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तित्वावर शहाजीराजे, लखुजीराव जाधव, जिजाबाई या व्यक्तिरेखांचा काय परिणाम झाला, तसेच शिवाजी महाराजांची दूरदृष्टी व नियोजन क्षमता यावर त्यांनी भाष्य केले.
शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील ठरावीक प्रसंग महत्त्वाचे नसून, त्यांच्या प्रत्येक लढाईतील बारकावे लक्षात घेणे गरजेचे आहे. शिवरायांना आणखी केवळ दहा वर्षांचे आयुष्य लाभले असते, तर महाराष्ट्राची तलवार लंडनमध्ये पोहोचली असती. महाराष्ट्रदिन साजरा करताना, राज्याच्या निर्माणातील 107 हुतात्म्यांची नावे मंत्रालयाच्या भिंतींवर नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केले.
डॉ. शंतनु अभ्यंकर यांनी मनोगत व्यक्त केले. व्याख्यानमालेचे कार्याध्यक्ष डॉ. चिंतामणी केळकर यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ पत्रकार दत्ता मर्ढेकर यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. मेधा साळवेकर यांनी आभार मानले. गरवारे टेक्निकल फायबर व मालाज् फूड प्रॉडक्टस् हे प्रायोजक होते.