नवी दिल्लीे – दिल्लीतील भाजपचे नेते कपिल मिश्रा यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळेच दिल्लीत दंगली सुरू झाल्याचा आरोप होत असून त्या प्रकरणात त्यांना त्वरीत अटक करण्याची मागणी सर्वत्र केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आजही त्यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य ट्विटरवर केले आहे. त्यांनी म्हटले आहे की जे बुरहान वाणी आणि अफजल गुरू यांना दहशतवादी समजत नाहींत तेच लोक मला आज दहशतवादी असे संबोधित आहेत. जे लोक याकुब मेमन, उमर खलिद, आणि शारजील इमाम यांच्या सुटकेसाठी कोर्टात गेले होते तेच लोक आज माझ्या अटकेची मागणी करीत आहेत असे नमूद करीत जय श्रीराम असे म्हणत त्यांनी हा ट्विटर संदेश प्रसारीत केला आहे.
शाहीनबागेत गेले दोन महिने धरणे धरून बसलेल्यांच्या विरोधात कपिल मिश्रा यांनी एक मोर्चा काढला होता व तेथे त्यांनी अत्यंत प्रक्षोभक भाषण करीत शाहीनबागेतील आंदोलकांना येत्या तीन दिवसांत त्या जागेवरून हाकलून दिले नाही तर पोलिसांनाच त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिला होता. त्यांच्या या प्रक्षोभक भाषणानंतरच दिल्लीत दंगलीला सुरूवात झाली असून या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक करावी अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे आपल्या प्रक्षोभक भाषणाचा व्हिडीओ त्यांनी स्वताच सोशल मिडीयावर टाकला होता.