वेलिंग्टन : न्यूझीलंडविरूध्दच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात दोन्ही डावांत फलंदाजांना अपयश आल्याने भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. फलंदाजी करताना अतिसावधपणे खेळणेच संघाला महागात पडल्याचे कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले. मात्र, त्याचवेळी आक्रमकता हेच बचावाचे योग्य धोरण आहे, असे सांगत त्याने सहकारी खेळाडूंना नैसर्गिक खेळ करण्याचा सल्लाही दिला.
पहिल्या कसोटीत भारताचा न्यूझीलंडने १० गडी राखून पराभव करत दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मयंक अग्रवाल, अजिंक्य रहाणे यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजांला न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा सामना करता आला नाही.
फलंदाजांनी आपल्या देहबोलीत बदल करण्याची गरज आहे. अति बचावत्मक खेळल्याने सामना वाचविता येईल किंवा धावा होतील असा विचार करणे प्रत्येकवेळी बरोबर ठरत नाही. काहीवेळा प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांचा टप्पा व दिशा बिघडविण्यासाठी आक्रमण करणे हा योग्य पर्याय ठरू शकतो. त्यामुळेच जर एकेरी व दुहेरी धावा काढणेही शक्य होत नसेल तर गोलंदाजांवर प्रतिआक्रमण करणे योग्य ठरते, असे कोहलीने व्यक्त केले. या मालिकेतील दुस-या व अखेरच्या कसोटीला येत्या २९ तारखेपासून सुरूवात होत आहे.