बऱ्याच दिवसांनी विसरभोळे सरांना फोन लावला. सरांनी फोन उचलताच विचारले, आज बरी आठवण काढली? मी मध्ये फोन केला तर तुम्ही उचललाही नाहीत? मी म्हणालो, बरोबर आहे सर जरा गडबडीत असल्यामुळे उचलला नसेल. मग सर म्हणाले, कसली गडबड? मी म्हणालो, ती दारूसाठीची रांग असेल. त्यावर मला पुढे न बोलू देता सर म्हणाले, म्हणजे तुम्ही रांग लावायला गेला होतात की काय? मी सरांना म्हणालो, काय सर चेष्टा करताय की काय? तुम्हाला चांगलेच माहीत आहे की मी पितो का? त्यावर सर म्हणाले, मग रांगेचे कारण काय? मी म्हणालो की, आमच्या इमारतीनंतर पाच सहा इमारती सोडल्यावर दारूचे दुकान आहे. ते चालू झाल्यामुळे गोंधळ झाला होता. त्या दुकानांची रांग थेट आमच्या सोसायटीमध्ये येऊन आतमध्ये पार्किंग जागेवर पूर्ण कब्जा केला होता लोकांनी. आमचे जाणे येणेही बंद झाले, मग पोलिसांच्या मदतीने त्या सर्वांना बाहेर काढून आमच्या सोसायटीच्या गेट समोरची जागा सोडून ती रांग पुढे चालू करायचे निर्देश पोलिसांनी दिले तेव्हा सर्व सुरळीत झाले. त्याच गडबडीत तुमचा फोन आला असेल म्हणून तो उचलला नसेल.
मग सर म्हणाले, हे बघा एक अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून मला विचाराल तर वस्तूंचे भाव मागणी व पुरवठ्यावर अवलंबून असतात. अलीकडे कृत्रिमरित्या दारूचा पुरवठा कमी झालाय. सरकारने दुकाने उघडायला परवानगी दिली व मागणी प्रचंड असल्यामुळे दुकानदारही आव्वाच्यासव्वा भावाने विकत आहेत, असे समजले. सरकारनेही महसुलावर नजर ठेवून विक्रीला परवानगी दिली आहे. जर एखाद्या वस्तूला आपल्या राज्यात बंदी नसेल मग ती कोणतीही असेल तर विकायला परवनगी देण्यात काहीच हरकत नसावी, असे माझे मत आहे. मी आश्चर्याने सरांना म्हणालो, हे तुम्ही म्हणताय? त्यावर सर म्हणाले, मी हे अर्धवट बोललो आहे.
केवळ अर्थशास्त्राकडे पाहून चालत नाही त्याची दुसरी बाजू सामाजिकशास्त्रही आहे. आणि सामाजिक स्वास्थ्य चांगले असेल तर अर्थशास्त्राला किंमत आहे आणि आर्थिक धोरण चांगले असेल तरच सामाजिक स्वास्थ्य चांगले राहू शकते. अमेरिकेत उद्योग-उद्योग म्हणून सामाजिक स्वास्थ्याकडे लक्ष दिले गेले नाही व आज सर्वात जास्त बळी अमेरिकेत गेलेले आहेत. म्हणून केवळ महसूल वाढावा म्हणून बंदी उठली असेल तर ते नक्कीच चुकीचे आहे. मी स्वतः दुकानासमोरची गर्दी पाहिलेली आहे, कुठले निर्बंध नि काय? गर्दीसाठी पोलिसांना पाचारण करावे लागले.
लॉकडाऊनमध्ये सवलती देण्याचा हा परिणाम आहे. सर्वप्रथम मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन घोषित करतानाच दोन ते तीन आठवडे बिलकुल सर्व बंद ठेवावयास हवे होते. म्हणजे नक्की रोगी कुठे आहेत ते समजले असते. आता एकूणच रुग्ण वाढत आहेत त्यामुळे असा लॉकडाऊन किती दिवस सुरू राहणार हा प्रश्न आहे. त्यामुळे आता हळूहळू वर्दळ वाढवावी लागेल. एसटीनेही गावी जाण्यासाठी सोय केली आहे, पण काही साधने नसताना किती जणांनी पायपीट केली त्याचे काहीच नाही. एकतर निम्मे प्रवासी असणार तसेच येताना गाडी रिकामी येणार म्हणजे तोटा वाढणारच आहे.
शेवटी प्राध्यापक म्हणाले की, कित्येक निर्णय हे तात्पुरते असतील कारण त्यांचा परिणाम काय असेल यावर पुढचा निर्णय अवलंबून राहील. औषध वा लस निर्माण होण्यास काही अवधी लागणार आहे. अशा वेळी जनतेनेही काही काळ करोनासह जगण्याचे कसब शिकून घेणे आवश्यक आहे.
– उत्तम पिंगळे