काल सरांना फोन केला व सर्व प्रथम त्यांना करोनाविषयी अपडेट दिले. सर म्हणाले की, परिस्थिती हळूहळू कठीण होत चालली आहे असे वाटते. सर पुढे म्हणाले की, अजून संख्या वाढत आहे म्हणजे लॉकडाऊनपूर्वी कोण, कुठे मिसळले गेले त्याचा हळूहळू प्रत्यय येत आहे व जोपर्यंत या संख्येला लगाम लागत नाही तोपर्यंत लॉकडाऊनही उठवणे कठीण होणार आहे.
आता आपण पाहिले आहे की कित्येक मोठमोठे समारंभ अगदी जागतिक ऑलिम्पिकही जपानने एक वर्षभर पुढे ढकलले आहे. त्यातूनच या भीषणतेची जाणीव होत आहे. बरं एवढे असूनही आपल्या देशात आयपीएलचे गोडवे चालू होते. आता परिस्थिती बदलत गेल्याने या आयोजकांच्या गळी उतरतेय की स्पर्धा कठीण आहे आणि म्हणून ती आता सस्पेंड केली आहे. सरकारनेही आता उद्योगधंद्याचा आराखडा तयार करावयाचे ठरवले आहे.
आपण पाहिले आहे की, करोनाच्या प्रादुर्भाव स्वरूपात देश व राज्याची विविध गटांत विभागणी केली आहे. आता पहिले म्हणजे जेथे रुग्ण वाढतात येथे नाकाबंदी तसेच 144 कलम लावले जात आहे जेणेकरून रुग्ण स्थलांतरित होऊ नयेत. त्या विभागासाठी कडक मार्गदर्शक तत्त्वे अमलात आणावी लागतील. त्यांचे पालनही काटेकोरपणे करणे आवश्यक आहे व रुग्णसंख्येच्या वाढीस उतरती कळा लागणे आवश्यक आहे.
बरं लॉकडाऊनने अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान झालेले आहे व त्यातूनही मार्ग काढावाच लागेल कारण शेवटी पैशाचे सोंग काही आणता येत नाही केवळ चलन वाढ करून महागाईला आमंत्रण देण्याचे होईल. बरं कित्येकांचा रोजगार स्थगित झाला आहे. अशावेळी पैसाही हातात नसणार आहे त्यामुळे वर महागाई आली तर परिस्थिती कठीण होईल. म्हणून यावरही विचार सुरू आहे.
ज्या विभागामध्ये रोग्यांची नोंद नाही वा वाढ थांबली आहे अशा ठिकाणी असलेल्या उद्योगधंद्यांना पुन्हा सुरू करावे लागेल. जेणेकरून एक आशादायक सुरुवात होऊन लोकांचे तसेच देशातही मनोधैर्य वाढू लागेल. उत्पादन सुरू झाल्याने वस्तूंचा तुटवडा पडणार नाही. आता सध्या आवश्यक म्हणजे डेली नीड्स, खाद्यपदार्थ, मास्क, वैद्यकीय उपकरणे, पीपीई, सॅनिटायझर्स, साबण व साफसफाईच्या वस्तू यांना खूप मागणी आहे. तसेच या वस्तू करोना उपचारासाठीही आवश्यक आहेत. यासाठी ग्रामीण भागात छोटे मोठे किंवा तात्पुरता स्वरूपाचे अशा वस्तूंचे उद्योग सुरू करावे लागतील.मोठमोठे खासगी उद्योग सुरू करण्याकरता प्रोत्साहन व सहाय्य देणे आवश्यक आहे. असे केल्याने जेथे रुग्ण जास्त आहेत व अशा वस्तूंची कमतरता भासत आहे अशा ठिकाणी ताबडतोबीने या वस्तू पाठवण्यात येतील. असे केल्याने एकीकडे रोजगार वाढत राहील व दुसरीकडे रोगही आटोक्यात आणता येईल.
फार्मा कंपन्या तसेच काही केमिकल कंपन्यांनाही सरकारने करोनावरील लस शोधण्याकरता प्रोत्साहित करणे आवश्यक आहे व तसे सरकार करतही आहे. स्थानिक पातळीवर जिल्हा किंवा विभाग बंदी ठेवावीच लागेल. सर्वात शेवटी व महत्त्वाचे म्हणजे लोकांनी आपली सहनशीलता सोडू नये गरज पडल्यास शहरातून गावी जाण्याकरता परवानगीही दिली जाईल. जर आपण करोनाबाधित नसाल तर तसे सर्टिफिकेट देऊन गावी जाऊ दिले जावे, यावर सरकारने विचार करणे आवश्यक आहे. अगदी महत्त्वाचे म्हणजे अफवा व राजकारण यांना कुणीही थारा देऊ नये कारण आपल्याकडे अगदी राजकारणाचेही राजकारण केले जाते.