नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात मोठ्या घडामोडी घडत असल्याचे दिसत आहे. कारण तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव हे सातत्याने भाजपच्या विरोधात सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र यावे, अशी भूमिका मांडत आहेत. त्यातच आता के चंद्रशेखर राव यांनी ‘भाजप मुक्त भारत’ असा नारा देत तेलंगणा राष्ट्र समिती राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी निजामाबादमध्ये बोलताना भाजपवर जोरदार निशाणा साधला. वेगळ्या राज्याच्या आंदोलनापासून प्रेरणा घेऊन ‘भाजप मुक्त भारत’ या नाऱ्याखाली टीआरएस राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करेल अशी घोषणा यावेळी त्यांनी केली. तसेच 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बिगरभाजप सरकार स्थापन झाल्यास देशभरातील शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाईल, असेही के.चंद्रशेखर राव यांनी सांगितले.
तेलंगणातील विकासाचे मॉडेल देशभरात लागू करण्यासाठी तेलंगणा राष्ट्र समिती राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करणार असल्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी जाहीर केले आहे. टीआरएस लोकांच्या पाठिंब्याने भारताचा चेहरा बदलेल असेही ते म्हणाले. निजामाबाद हे एक समृद्ध शहर आहे. लोकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आम्ही लवकरच निजामाबादमधून राष्ट्रीय पातळीवरील निवडणूक प्रचाराला सुरुवात करु, असेही के चंद्रशेखर राव म्हणाले.
दरम्यान,गेल्याच आठवड्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे बिहारच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं या दोन नेत्यांची झालेली भेट महत्वाची मानली जात आहे.