नवी दिल्ली- सैन्यात सामील होण्याची सक्ती कुणावरही असू शकत नाही. जर एखाद्याला देशसेवेच्या भावनेने सैन्यात दाखल व्हायचे असेल तर त्याच्यासाठी नेहमीच सैन्यदलाचे दरवाजे खुले आहेत. मात्र सरकार त्यासाठी कुणालाही जबरदस्ती करू शकत नाही. जर तुम्हाला नव्या योजनेतील अटी मान्य नसतील, तर तुम्हाला सैन्यात येण्याची सक्ती कोण करतेय? असा सवाल केंद्रीय मंत्री आणि माजी लष्कर प्रमुख जनरल व्ही के. सिंह यांनी केला आहे.
अग्निपथ योजनेवर कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी जोरदार टीका केली होती. सरकारने ही योजना मागे घ्यावी, अशी मागणी प्रियंका गांधींनी केली आहे. सरकारला जाणीवपूर्वक टार्गेट करण्यासाठी कॉंग्रेसकडून या योजनेवर टीका करण्यात येत असल्याचा दावा व्ही. के. सिंह यांनी केला आहे.
ईडीकडून राहुल गांधींची चौकशी सुरू आहे. या कारणामुळे कॉंग्रेस संतप्त असून त्याचा बदला घेण्यासाठीच या योजनेवर टीका करण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. कॉंग्रेसकडून याच कारणासाठी अग्निपथ योजनेतील बारीकसारीक दोष काढले जात आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
अग्निपथ योजना मान्य नसेल तर सैन्यात भरती होऊ नका. सैन्यात येण्याची तुम्हाला कुणीही सक्ती केलेली नाही. सैन्यात यावं असा आग्रह कुणालाही सरकारने केलेला नाही, अशी टीका सिंह यांनी केली. अग्निपथ योजनेविरोधात आंदोलन कऱणाऱ्यांना त्यांनी इशारा दिला असून या योजनेला सुरु असलेला विरोध हा नाहक असल्याचे म्हटले आहे.
सैन्यदलात नोकरी करायची की नाही, हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. सरकारने भरती प्रक्रियेची पद्धत बदलली आहे. ती मान्य नसेल तर नोकरी न करण्याचा पर्याय तरुणांसमोर आहेच. सैन्यभरती म्हणजे काही रोजगार हमी योजना नाही. ते कुठले दुकान नाही किंवा एखादी कंपनी नाही, असे म्हणत त्यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे.