दिल्ली – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मला सैन्यात भरती व्हायचे होते, पण कौटुंबिक समस्यांमुळे होता आलं नाही असं मत व्यक्त केलं. आसाम रायफल्स आणि भारतीय लष्कराच्या 57 व्या माउंटन डिव्हिजनच्या जवानांना संबोधित करताना सिंह यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राजनाथ सिंग यांनी सशस्त्र दलात भरती होण्यासाठी परीक्षा देखील दिली असल्याचा यावेळी खुलासा केला.
राजनाथ सिंह म्हणाले “मला माझ्या लहानपणाची गोष्ट सांगायची आहे. मलाही सैन्यात भरती व्हायचे होते आणि मी एकदा शॉर्ट सर्व्हिस कमिशनची परीक्षा दिली. मी लेखी परीक्षा दिली होती, पण माझ्या वडिलांचे निधन आणि इतर काही कौटुंबिक समस्यांमुळे मी सैन्यात भरती होऊ शकलो नाही.
ते पुढे म्हणाले, जर तुम्ही एखाद्या मुलाला सैन्याचा गणवेश दिला तर त्याचे व्यक्तिमत्त्व बदललेले दिसते. कारण या गणवेशात काहीतरी खास आहे. सिंह यांनी मंत्रीपुखरी येथील आसाम रायफल्सच्या महानिरीक्षक मुख्यालयाला भेट दिली तेव्हा लष्करप्रमुख जनरल मनोज पांडेही त्यांच्यासोबत होते. सिंह यांनी मुख्यालयात सशस्त्र दलांची भेट घेतली.