मुंबई – काल पर्यंत तुम्ही शरद पवार आमचे दैवत होता असं म्हणत होतात मग आज अचानक पवारांवर का बोलताय.या सर्वांनी शरद पवारांना (Sharad Pawar) संपवण्याची सुपारी घेतली आहे. असा निशाणा आवाज शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटातील नेत्यांवर साधला. आज अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) चिंतन शिबीर कर्जत येथे पार पडले त्यावेळी करण्यात आलेल्या टीकेला जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल. (Ncp)
यांनी शरद पवारांवर टीका केली नसती तर यांची भाषणे महाराष्ट्रात गेली नसती हे त्यांना पण माहिती आहे. शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय त्यांची राजकीय उन्नती नाही हे त्यांना देखील माहिती आहे.म्हणुणच शरद पवारांच्या भोवतीच महाराष्ट्राचं राजकारण फिरतंय असं देखील जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यावेळी म्हणाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा समाचार घेतला.
अजित पवारांच्या मेळाव्यात काही जुन्या भेटींचा उल्लेख करण्यात आला होता त्याबाबत देखील आव्हाडांनी यावेळी भाष्य केलं. शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय आणि त्यांचा फोटो लावल्याशिवाय यांचं राजकरण पुढे जाणार नाही असं आव्हाड यावेळी म्हणाले.
अजित पवारांनी शरद पवारांनी दिलेल्या राजीनाम्याचा केला होता उल्लेख
अजित पवार आपल्या मेळाव्यात म्हणाले होते,”१ मे रोजी मला शरद पवारांनी बोलवून सांगितलं की आता सरकारमध्ये जा. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. इतर कुणालाही माहिती नाही. घरातल्या फक्त चौघांना माहिती होतं. ते राजीनामा देणार होते. तशा प्रकारे त्यांनी राजीनामा दिला. १५ लोकांची कमिटी तिथेच जाहीर केली. त्यांनी बसावं आणि अध्यक्ष निवडावा. मग सगळे आश्चर्यचकित झाले. तिथे वातावरण बदललं. ते घरी गेल्यानंतर वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी प्रतिक्रिया दिली”, असं अजित पवार म्हणाले.
“त्यानंतर त्यांनी दिलेला राजीनामा मागे घेतला गेला. आम्हाला सांगितलं की सुप्रियाला माझ्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष करा. सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या. सगळ्यांनी तयारी दाखवली. ही धरसोड वृत्ती, गाफील ठेवणं बरोबर नाही. हे मला पटत नाही. तुम्ही एकदा काय ते ठरवा. एक घाव दोन तुकडे, विषय संपला”, असंही अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले.