Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता, तो 14 वर्ष वनवास भोगला होता, मग ते शाकाहारी कसे असू शकतात? असे वक्तव्य आव्हाड यांनी शिर्डीमध्ये केले यामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. या विधानानंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहे.
यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले,’मी महाराष्ट्राला नेहमीच संबोधित करत आलोय तसेच मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही, इतिहासाचा विपर्यास करणं हे माझं काम नाही. काल मी जे बोललो ते ओघात बोलून गेले’ असेही ते म्हणाले आहे.
जितेंद्र आव्हाड आपली भूमिका स्पष्ट करत पुढे म्हणाले,’राम- प्रभू श्रीराम ज्याला आम्ही महाराष्ट्रात रामकृष्ण हरी म्हणतो. जो आमचा पांडुरंग आहे तोच राम आहे. त्या श्रीरामाबद्दल बोलताना मी म्हटलं की ते मांसाहारी होते. हा वाद मला वाढवायचा नाहीये. पण जे याच्या विरोधात उभे राहिलेत त्यांच्या माहितीसाठी सांगतो. वाल्मिकी रामायणामध्ये 6 कंद आहेत. त्यातल्या अयोध्या कंदातील सर्ग 52 आणि श्लोक 102 यात हा उल्लेख आहे. मात्र मला हा वाद वाढवायचा नाही म्हणून मी हे वाचून दाखवत नाही’
तत्पूर्वी, येत्या 22 जानेवारीला अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. संपूर्ण देशभरात या उत्सवामुळे उत्साहाचे वातावरण आहे. अशातच जितेंद्र आव्हाड यांचे प्रभू श्री राम मांसाहारी असल्याचे वादग्रस्त वक्तव्य पुढे आले आहे.