सातारा -जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यातील 6 लाख 69 हजार मोठी जनावरे व पाच लाख शेळ्या- मेंढ्यांना जंतनाशक औषधे देण्यासाठी जिल्ह्यात 900 गावांमध्ये बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या जंत निर्मूलन शिबिरास पशुपालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राज्यात अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असून या शिबिराचे उदघाटन शिवाजीनगर, शिरवळ (ता. खंडाळा) येथे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र पताप सिंह यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
जिल्ह्यातील 900 गावांमध्ये शिबिरे पार पाडण्यासाठी 450 टीम तयार करण्यात आल्या होत्या. शिरवळ येथे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र पताप सिंह यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी आयुक्तांनी विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. 1962 या टोल फ्री क्रमांकाबाबत माहिती देऊन विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी पशुपालकांना केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय कबुले, प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, माजी सभापती मनोज पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, गटविकास अधिकारी बिचुकले आदी उपस्थित होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व पशुसंवर्धन दिनानिमित्त जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत लहान, मोठी जनावरे व शेळ्या- मेंढ्यांना जंतनाशक औषधे देण्यात आली.
यासाठी प्रती जनावर एक रुपया सेवा शुल्क घेण्यात आले. उर्वरित गावांमध्ये दि. 30 मेपर्यंत शिबिरे घेऊन
शंभर टक्के जनावरांना जंत निर्मूलन औषधे देण्यात येणार असल्याचे डॉ. संजय शिंदे यांनी यावेळी सांगितले. पशुपालकांना जंत निर्मूलनासाठी आवश्यक औषधे जिल्हा वार्षिक योजना, जिल्हा परिषद सेस योजना, विशेष घटक योजना यांमधून देण्यात आली.