कोलकाता – महागाई सात टक्क्यांवर गेली आहे. आगामी काळातही ती कमी होण्याची शक्यता नाही. दरम्यानच्या काळामध्ये रशिया- युक्रेन युद्धामुळे आर्थिक अनिश्चितता निर्माण झाल्या आहेत. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी गुंतवणूकदार सोन्याचा आश्रय घेत असून अक्षय्य तृतीयेला ग्राहकाकडून सोन्याच्या खरेदीमध्ये बरीच वाढ झाली असल्याचे दागिने उत्पादकांनी सांगितले.
दागीने उत्पादकाच्या संघटनेने म्हटले आहे की सर्वसाधारणपणे या वर्षी अक्षय तृतीयेला दुकानांमध्ये येणाऱ्यांच्या संख्येमध्ये 30 ते 40 टक्क्यांची वाढ झाली आहे. एक तर महागाई जास्त आहे. रशिया- युक्रेन युद्ध सुरू आहे. त्याचबरोबर अक्षय तृतीयेला भारतामध्ये सोन्याची खरेदी करण्याची प्रथा आहे.
या कारणामुळे ग्राहकांची दुकानात गर्दी वाढल्याचे दागिने उत्पादकांनी सांगितले. गेल्या दोन वर्षापासून अक्षय तृतीयेला करोना व्हायरसमुळे ग्राहकांचा इतका प्रतिसाद मिळत नव्हता. यावेळी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानदारानी अनेक योजना राबविल्या आहेत. त्यामध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना मिठाई देणे, कॅलेंडर देणे अशा प्रकारच्या युक्त्या या दुकानदारानी राबविल्या आहेत.
त्याचबरोबर डिजिटल सोने खरेदी करण्याची योजना बऱ्याच दुकानदारांनी सुरू केली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन या संघटनेचे पश्चिम बंगालमधील अध्यक्ष अशोक बेगानी यांनी सांगितले की ग्राहक पर्यटन आणि इतर वायफळ खर्च टाळून सोन्यामध्ये खर्च करणे अधिक पसंत करीत आहेत. त्यामुळे ग्राहकांना महागाईपासून संरक्षण मिळते याची जाणीव त्यांना झाली आहे. ते म्हणाले की महागाईविरोधात कुटुंबाला संरक्षण करण्यासाठी सोने खरेदी जास्त उपयुक्त ठरते हे ग्राहकांना आता कळून येत आहे.
बचतीमधील गुंतवणूक सोन्यात
अगोदर एकूण बचतीच्या साधारणपणे 25 टक्के एवढी रक्कम सोने खरेदीसाठी वापरली जात होती. आता हे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत वाढले असल्याचा नागीने उत्पादकांनी केला. प्राप्त संकेतानुसार या वर्षी अक्षय तृतीयेला सोन्याची खरेदी 20 टक्क्यांनी वाढली असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या संदर्भातील आकडेवारी लवकरच जाहीर होईल. गेल्या दहा ते पंधरा दिवसापासूनच ग्राहकांचे दालनाला भेट देण्याचे प्रमाण वाढले होते. आज अक्षयतृतीयेला ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असल्याचे त्यांनी सांगितले.