मुंबई: काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या लखीमपूर येथे पीडितांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात असताना त्यांना रोखण्यात आलं. आधी त्यांना नजरकैदेत ठेवलं त्यानंतर त्यांना अटक करण्यात आलं. उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या या कारवाईच्या निषेधार्थ उद्यापासून देशभर जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधताना ही घोषणा केली. 4 ऑक्टोबर 1977ला त्यावेळेसच्या जनता पार्टीने इंदिरा गांधींना अटक केली होती. त्याच घटनेची पुनरावृत्ती होत आहे. प्रियंका गांधी यांना अटक करून भाजपने ही पुनरावृत्ती केली आहे. त्यावेळेज जनता पार्टीची जी अवस्था झाली होती, आता तीच अवस्था भाजपची होणार आहे. प्रियंका गांधी यांना भाजपने सन्मानाने सोडले नाही तर आम्ही उद्यापासून देशभर जेलभरो आंदोलन करणार आहोत, असं पटोले म्हणाले.
देशात सध्या पुन्हा एकदा हुकूमशाही पाहायला मिळत आहे. मात्र, लोकच त्यांना त्यांची जागा दाखवणार आहेत. सध्या भ्रष्टाचाराचे आरोप असणारे मंत्री सत्तेत पाहायला मिळत आहेत. केंद्र सरकारच्या काळ्या कायद्याविरोधात देश पेटलेला पाहायला मिळत आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री उत्तर प्रदेशला जाणार होते. त्यांनाही विमानतळावरून माघारी परतावं लागलं. त्यांनाही जाऊ दिलं नाही. केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार गांधी कुटुंबाला घाबरताना दिसत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी अकोला बँक निवडणुकीवर बोलण्यास नकार दिला. बच्चू कडू हे अपक्ष आमदार असून ते शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झाले आहेत. आम्ही जास्त त्यावर बोलणार नाही. त्यांचा निर्णय ते स्वतः घेतात, असं त्यांनी सांगितलं.
राज्यातील जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीच्या निकालावरही त्यांनी भाष्य केलं. आतापर्यंत जो कल आपण पाहतोय ते पाहता भाजप मागे पडला आहे. अजून निकाल यायला वेळ आहे. पण काँग्रेस बऱ्याच जागेवर आघाडीवर आहे, असा दावा त्यांनी केला.