जेजुरी -अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत तथा बहुजन बांधवांचा लोकदेव म्हणून प्रचलित असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची चैत्र पौर्णिमा यात्रा रद्द करण्यात आली आहे. बुधवार (दि. 8) चैत्र पौर्णिमा असली तरी राज्यातील भाविकांनी आणि पौर्णिमा उत्सवातील शिखरकाठी मानकऱ्यांनी जेजुरीत दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरामध्ये करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मार्तंड देवसंस्थान, महसूल, जेजुरी नगरपालिका, आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहे. दिवसेंदिवस करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व ठिकाणची मंदिरे, मशिदी, गुरुद्वारा, चर्च, प्रार्थनास्थळे दर्शनासाठी बंद करण्यात आली आहेत.
त्यानुसार चैत्र पौर्णिमा यात्रा रद्द करण्यात आली आहे. ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी, पुजारी व विश्वस्त यामध्ये चर्चा झाली आणि यामध्ये भाविकांना आवाहन करण्यात आले. कोणीही भाविकांनी, वा शिखर काठी मांनकऱ्यांनी जेजुरीत दर्शनासाठी येऊ नये.
मात्र, आठवडेकरी पुजारी, पाच सेवेकरी यांच्या हस्ते खंडोबा महाराजांचे नित्य धार्मिक विधी होणार आहेत, असे सांगण्यात आले आहे.
यावेळी प्रमुख विश्वस्त संदीप जगताप, विश्वस्त शिवराज झगडे, पंकज निकुडेपाटील, माजी प्रमुख विश्वस्त सुधीर गोडसे, ग्रामस्थ खांदेकरी मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे, नित्य सेवेकरी जालिंदर खोमणे, कृष्णा कुदळे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.