पाटणा – देशव्याप्ती लॉकडाऊनमुळे देशाच्या अन्य भागांमध्ये अडकलेल्या स्थलांतरित कामगारांना बिहार सरकारने प्रत्येकी 1 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. देशभरात लॉकडाऊनमुळे बिहार सरकारने देशातील इतर भागात अडकलेल्या एक लाखाहून अधिक प्रवासी कामगारांच्या बॅंक खात्यात प्रत्येकी एक हजार रुपये हस्तांतरित केले आहेत.
अशा प्रकारे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या स्थलांतरित मजुरांच्या थेट बॅंक खात्यांमध्ये मदत जमा करणारे बिहार हे देशातील पहिले राज्य ठरले असल्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले आहे. राज्य सरकारने यासाठी मुख्यमंत्री मदत निधीमध्ये 100 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचेही नितीश कुमार यांनी सांगितले.
बिहारच्या ज्या जनतेला मदतीची आवश्यकता आहे आणि ज्यांना लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे मदत मिळणे दुरापस्त झाले अशांसाठीही लवकरच मदत उपलब्ध करून दिली जाईल, असेही नितीश कुमार यांनी म्हटले आहे. आतापर्यंत दोन लाख 84 हजार स्थलांतरित कामगारांनी आर्थिक मदतीसाठी अर्ज केले आहेत.